पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा गजर आज सगळीकडेच ऐकू येतो आहे. राज्यात कोरोनाचं संकट असलं तरीही गणरायाची प्रतिष्ठापना आणि त्याबाबतचा उत्साह चांगलाच दिसून येतो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच अनुषंगाने गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छा?
आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!”, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.
देशभरातील गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे करोनाचा धोका देखील कायम आहे. राज्यात करोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. मुंबईसह अन्य शहरांत दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात संसर्ग अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. तज्ञांकडून करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला आहे. वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात देशाला तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे. उत्सव साजरा करण्यासोबतच सर्व नियमाचं काटेकोरपणे पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. गंभीर स्थिती टाळण्यासाठी प्रत्येकालाच जबाबदारीचं भान असणं महत्त्वाचं आहे.
मुंबई आणि पुणे पोलिसांनी उत्सवाच्या काळात होणारी गर्दी आणि पर्यायाने करोना रुग्णसंख्या वाढण्याचा धोका लक्षात घेऊन शहरांमधे जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. मुंबई आणि पुण्यात आजपासू 19 सप्टेंबरपर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई आहे. 19 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी म्हणजेच लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस आहे. त्या दिवसापर्यंत जमावबंदीचं कलम 144 लागू असणार आहे. गेल्या वर्षी अनेक सार्वजनिक मंडळांनी गणेश उत्सव साजरा करतानाच आरोग्य उत्सवही साजरा केला होता. आता यावर्षीही काही प्रमाणात उत्सवाचं स्वरूप हे अशाच प्रकारचं आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्यात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला जातो. गर्दी टाळत, कोरोना प्रतिबंधांचं पालन करत हा उत्सव साजरा केला जातो आहे.
ADVERTISEMENT