Andheri Bypoll : भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई तक

17 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:42 AM)

गेल्या काही दिवसांपासून अंधेरीची पोटनिवडणूक चर्चेत आहे. अशात आजही या निवडणुकीची चर्चा होते आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. मुरजी पटेल हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून रविवारी पत्र लिहिलं होतं. त्यात उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली […]

Mumbaitak
follow google news

गेल्या काही दिवसांपासून अंधेरीची पोटनिवडणूक चर्चेत आहे. अशात आजही या निवडणुकीची चर्चा होते आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. मुरजी पटेल हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून रविवारी पत्र लिहिलं होतं. त्यात उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आता आज भाजपने उमेदवारी मागे घेतली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी?

श्री. देवेंद्र फडणवीस

उप-मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य

प्रिय मित्र देवेंद्रजी,

सस्नेह जय महाराष्ट्र !

काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार..

आपला मित्र,

राज ठाकरे

रमेश लटकेंच्या निधनामुळे होते आहे पोटनिवडणूक

रमेश लटकेंच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. ही निवडणूक लढवण्याची भूमिका भाजपनं सुरुवातीला घेतली होती. भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर निवडणुकीला वेगळं वळणं मिळालं होतं.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याबद्दल काय सांगितलं?

मुंबईत भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठका झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, ऋतुजा लटके यांना भाजप पाठिंबा देत असून, भाजप उमेदवार निवडणूक लढवणार नाही. मुरजी पटेल अर्ज मागे घेत असून, ते अपक्षही लढणार नाहीत, असं बावनकुळे म्हणाले.

निवडणूक लढवण्याची आशिष शेलारांची होती भूमिका?

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आधीच उमेदवार जाहीर केला होता. त्यामुळे विरोधात शिंदे गट उमेदवारी देणार की भाजप अशी उत्सुकता होती. मात्र, आशिष शेलार यांनी लगेच मुरजी पटेलांच्या नावाची घोषणा केली होती.

मुरजी पटेलांच्या नावाची घोषणा पक्षाकडून अधिकृतपणे अखेरच्या दिवशी करण्यात आली. मात्र त्यापूर्वीच मुरजी पटेल हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात होते. मात्र, त्यांना थांबवलं गेलं होतं. पटेल हे शेलारांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यामुळेच आशिष शेलार ही निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत असल्याचं म्हटलं जात होतं.

    follow whatsapp