फडणवीसांच्या HMV पत्रकारांच्या विधानावरून रोहित पवारांचा पलटवार, जनतेला केलं आवाहन

मुंबई तक

• 07:23 AM • 01 Nov 2022

“काही राजकीय पक्ष, त्यांची इको सिस्टीम आणि दुर्दैवानं बोटावर मोजण्याइतके चार-पाच एचएमव्ही पत्रकार हे महाराष्ट्रातून उद्योग चालल्याचं फेक नरेटिव्ह तयार करत आहेत”, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. त्यांच्या या विधानावर आदित्य ठाकरेंनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही भूमिका मांडलीये. फडणवीसांना उत्तर देतानाच रोहित पवारांनी जनतेलाही आवाहन केलंय. देवेंद्र फडणवीसांच्या एचएमव्ही पत्रकार विधानावर […]

Mumbaitak
follow google news

“काही राजकीय पक्ष, त्यांची इको सिस्टीम आणि दुर्दैवानं बोटावर मोजण्याइतके चार-पाच एचएमव्ही पत्रकार हे महाराष्ट्रातून उद्योग चालल्याचं फेक नरेटिव्ह तयार करत आहेत”, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. त्यांच्या या विधानावर आदित्य ठाकरेंनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही भूमिका मांडलीये. फडणवीसांना उत्तर देतानाच रोहित पवारांनी जनतेलाही आवाहन केलंय.

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीसांच्या एचएमव्ही पत्रकार विधानावर बोट ठेवत रोहित पवारांनी एक ट्विट केलंय. ते म्हणतात, “महाराष्ट्राची बाजू मांडणारा मग तो पत्रकार असो… युवा असो… किंवा सामान्य नागरिक असो… हे सर्वच जण नक्कीच HMV म्हणजे He is Maharashtra’s Voice आहेत. राजकीय नेते गप्प बसले तरी खरे HMV मात्र महाराष्ट्राची भूमिका मांडताना कधीही गप्प बसणार नाहीत”, असं रोहित पवारांनी ट्विट करत म्हटलंय.

रोहित पवार देवेंद्र फडणवीसांच्या विधानाला उत्तर देताना पुढे म्हणतात, “कितीही प्रयत्न केले तरी सामान्यांचा आवाज दाबता येत नाही. आजची राजकीय परिस्थिती बघता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपल्या प्रत्येकालाच आवाज उठवावा लागणार आहे आणि WMV म्हणजेच We Are Maharashtra’s Voice व्हावं लागणार आहे”, असं आवाहन त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला केलंय.

Devendra Fadnavis: “टाटाच्या प्रमुखांनी त्यावेळी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की एअरबस प्रकल्प गुजरातला जातोय”

देवेंद्र फडणवीस पत्रकारांबद्दल काय म्हणाले?

“महाराष्ट्रात आमचं सरकार येऊन तीन महिनेच झालेत. तरीही एक फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय की महाराष्ट्रातून उद्योग चालले आहेत. आणि या फेक नरेटिव्हमध्ये काही राजकीय पक्ष, त्यांची इको सिस्टीम आणि दुर्दैवानं बोटावर मोजण्याइतके चार-पाच एचएमव्ही पत्रकार हे एकत्रितपणे… एचएमव्हीचा अर्थ हीज मास्टर्स व्हाईस. त्यांचे मास्टर कोण आहेत, तुम्हाला माहितीये. एचएमव्ही पत्रकार असे मिळून सगळ्यांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातलाय”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

देवेंद्र फडणवीसांचे दावे; आदित्य ठाकरेंचं जशास तसं उत्तर!

आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर आदित्य ठाकरे म्हणाले होते की, “महाराष्ट्रासाठी आवाज उठवणारे असतील किंवा फ्रीडम ऑफ स्पीच याच्यावर विश्वास ठेवणारे पत्रकार असतील, जे आमच्यावरही टीका करतात. त्यांना एचएमव्ही म्हटलं गेलंय. जे बेरोजगार तरुण नोकरीसाठी आंदोलन करताहेत, त्यांना शेंबडी पोरं म्हटलं गेलंय. खरंतर या दोन्ही वक्तव्यांसाठी… उपमुख्यमंत्री असं म्हणालेत की ते दोन आमदार रागारागात बोलले, तसंच हे देखील रागारागात बोलले असतील, तर ते शब्द त्यांनी मागे घ्यावेत. कारण हीज मास्टर्स व्हाईस किंवा शेंबडी पोरं बोलणं हे पत्रकार आणि पत्रकारितेचा अपमान आहे. शेंबडी पोरं म्हणणं हे निंदनीय आहे”, असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांना शब्द मागे घेण्याची मागणी केलेली आहे.

    follow whatsapp