शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उल्लेख केलेले भाजपचे साडेतीन लोक कोण?

मुंबई तक

• 09:58 AM • 15 Feb 2022

शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुंबईत याचं वातावरणही तयार झालं आहे. नाशिक, मुंबई, पुणे या ठिकाणाहून शिवसेना भवन या ठिकाणी पोहचत आहेत. पत्रकार परिषदेच्या निमित्ताने शिवसेना एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच करते आहे. अशात भाजपचे साडेतीन लोक असा उल्लेख संजय राऊत यांनी […]

Mumbaitak
follow google news

शिवसेना खासदार संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुंबईत याचं वातावरणही तयार झालं आहे. नाशिक, मुंबई, पुणे या ठिकाणाहून शिवसेना भवन या ठिकाणी पोहचत आहेत. पत्रकार परिषदेच्या निमित्ताने शिवसेना एक प्रकारे शक्ती प्रदर्शनच करते आहे. अशात भाजपचे साडेतीन लोक असा उल्लेख संजय राऊत यांनी केला आहे. पेशवाईत साडेतीन शहाण्यांच्या उल्लेख आहे. भाजप हा पेशव्यांचा पक्ष आहे अशीही टीका त्यांच्यावर होत असते. अशात आता संजय राऊत यांनी साडेतीन लोकांचा उल्लेख केला आहे त्याची चर्चा होते आहे.

हे वाचलं का?

पेशवाईतले साडेतीन शहाणे कोण? तर पेशवाईच्या काळातील साडेतीन शहाणे म्हणून सखारामपंत बोकील, देवाजीपंत चोरघडे, विठ्ठल सुंदर हे पूर्ण शहाणे म्हणून ओळखले जातात. हे तिघेही मुत्सद्दी आणि योद्धे होते. तर, उरलेले अर्धे शहाणे म्हणून नाना फडणवीस यांचा उल्लेख करण्यात येतो. कारण नाना फडणवीसांना युद्धकला फारशी अवगत नव्हती. ते मुत्सदी आणि धोरणी होते पण युद्धात पारंगत नव्हते त्यामुळे त्यांचा उल्लेख अर्धे शहाणे असा केला जातो.

‘संजय राऊत इशारा देतात तेव्हा…’ स्फोटक पत्रकार परिषदेबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

भाजपचे साडेतीन लोक कोण असू शकतात?

किरीट सोमय्या- भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केले जात आहे. सोमय्या यांनी काही प्रकरणांमध्ये घोटाळा झाला असल्याचा दावा केला आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले काही नेत्यांविरोधात ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे सोमय्या यांचे एखादे प्रकरण शिवसेना उघडकीस आणणार असल्याचे म्हटले जात आहे.

आशिष शेलार- मुंबई महापालिकेच्या कारभारावरून भाजप आमदार आशिष शेलार यांच्याकडून सातत्याने टीका केली जाते. आदित्य ठाकरे यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘कोस्टल रोड’ प्रकल्पात गैरव्यवहार झाला असल्याचे आरोप त्यांच्याकडून करण्यात येत होता. आशिष शेलार यांच्याशी निगडीत एखादा गैरव्यवहार समोर येतो का, याबाबत चर्चा सुरू आहेत.

प्रवीण दरेकर : मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी प्रविण दरेकर गोवले असल्याचा आरोप करण्यात येतो. दरेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मुंबई बँकेच्या संचालकपदी असताना त्यांनी घेतलेले काही निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.

देवेंद्र फडणवीस : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित एखादे प्रकरण उजेडात येईल अशी चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन इशारा दिला होता.

अमृता फडणवीसः साडेतीन लोकांमध्ये अमृता फडणवीस यांचंही नाव असू शकतं कारण अमृता फडणवीस या सातत्याने महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत असतात.

या नावांचा उल्लेख साडेतीन लोक म्हणून केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. आता संजय राऊत भाजपचे साडेतीन लोक म्हणून कोणाचा उल्लेख करणार आणि त्यांच्याबाबत काय काय आरोप करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp