मंदिरं उघडण्यासाठी सरकारला अडचण काय आहे? अण्णा हजारेंचा सरकारला सवाल

मुंबई तक

• 09:08 AM • 29 Aug 2021

कोरोनाच्या लाटेचा सामना करत असताना राज्यातली धार्मिक स्थळ बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. राज्यातली मंदिर उघडण्यासाठी सरकारला अडचण काय आहे असा सवाल अण्णांनी विचारला आहे. ते राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलत होते. “दारुची दुकानं, हॉटेल सर्वकाही उघडलेलं आहे. तिकडे होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढत नाही का? […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या लाटेचा सामना करत असताना राज्यातली धार्मिक स्थळ बंद ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. राज्यातली मंदिर उघडण्यासाठी सरकारला अडचण काय आहे असा सवाल अण्णांनी विचारला आहे. ते राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी बोलत होते.

हे वाचलं का?

“दारुची दुकानं, हॉटेल सर्वकाही उघडलेलं आहे. तिकडे होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढत नाही का? सात्विक विचारांमधून माणसं घडतात अशा मंदिरांना बंद करुन सरकारने नेमकं काय मिळवलं? मंदिर उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. मंदिर बचाव कृती समितीने यासाठी मोठं आंदोलन उभारावं यात मी स्वतः सहभागी होईन”, अशी ग्वाही अण्णा हजारेंनी दिली.

यावेळी बोलत असताना अण्णा हजारेंनी मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावर आपलं मत सविस्तर मांडलं. भरकटत चाललेल्या समाजाला मंदिरं तारु शकतात यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे ते मंदिरातून मिळालेल्या संस्कारांमुळे आहे. माझं वय ८४ आहे, अजुनही माझ्यावर कोणताच डाग नाही…हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या समाधीजवळ जाऊन मी तुळशीची माळ घालत वारकरी झालोय. संतांचे विचार देणारी मंदिर का बंद झाली, सरकारला संताचे विचार समजले का असा प्रश्न अण्णा हजारेंनी विचारला.

सरकारने आपल्या धोरणांमध्ये लवकरात लवकर बदल करुन मंदिरं उघडावी अशी सूचना अण्णा हजारेंनी केली आहे. यावेळी मंदिर बचाव कृती समितीचे वसंत लोढा यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली. मंदिर बचाव कृती समिती अण्णांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करेल अशी माहिती लोढा यांनी दिली.

    follow whatsapp