यांना शेतकऱ्यांचं सरकार का म्हणायचं? महाविकास आघाडीवर राजू शेट्टींची घणाघाती टीका

मुंबई तक

• 11:11 AM • 27 Mar 2022

महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचा घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नसला तरीही पाच तारखेला कोल्हापुरात पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल असं कळतंय. स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलत असताना सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर टीका करताना, बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या […]

Mumbaitak
follow google news

महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचा घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नसला तरीही पाच तारखेला कोल्हापुरात पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत याबद्दल अंतिम निर्णय घेतला जाईल असं कळतंय. स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलत असताना सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर टीका करताना, बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.

हे वाचलं का?

गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टींची उसदराच्या एफआरपीचा मुद्दा आणि शेतकऱ्यांना सकाळी वीज मिळावी यासाठी सरकारविरुद्ध आंदोलन केलं होतं. आज बारामतीत एका कार्यक्रमात बोलत असताना शेट्टींनी महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर टीका केली.

स्वाभिमानीचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी,राजू शेट्टींनी केली घोषणा

“पाच तारखेला कोल्हापुरात स्वाभिमानीच्या कार्यकारणची बैठक आहे. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कामाची चिकीत्सा केली जाईल. त्यांच्या कामाची चिरफाड केली जाईल. या काळात जे शेतकरी विरोधी निर्णय घेतले गेलेले आहेत याबद्दल आम्ही चर्चा करु. भूमिअधिग्रहण कायद्यात बदल करुन शेतकऱ्याचा मोबदला जवळपास ७० टक्क्याने कमी केला गेला आहे. उसाच्या एफआरपीचे दोन तुकडे, बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मतदानाचा हक्क काढून घेणं या सारख्या प्रश्नांवर सरकारने निराशा केली आहे.”

उसदर नियंत्रण करणाऱ्या समितीची स्थापनाही अशा पद्धतीने झाली आहे की तिकडे कारखानदारांशिवाय कोणी बोलतच नाही. अशा अनेक मुद्द्यांवर कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा केली जाईल असं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं.

ज्या शेतकऱ्यांसाठी ही महाविकास आघाडी तयार झाली त्यांचे प्रश्न सोडवले गेले का? अतिवृष्टी आणि महापुरात ज्यांचं नुकसान झालं त्यांना २०१९ पेक्षा जास्त भरपाई देऊ असं आश्वासन देऊनही सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. अशा परिस्थिती मग यांना शेतकऱ्यांचं सरकार का म्हणायचं? या सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊन अंतिम निर्णय़ घेतला जाईल असं शेट्टी म्हणाले.

महावितरण vs महसूल : एकाने वीज तोडली, दुसऱ्याने ऑफिसला ठोकलं टाळं, दोन विभागांमध्ये शीतयुद्ध

उपस्थित पत्रकारांनी तुम्ही दुसऱ्या पक्षात जाणार का असं विचारलं असता राजू शेट्टींनी मी दुसऱ्या पक्षासोबत जाण्याचा संबंधच येत नसल्याचं सांगितलं. मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे. अखेरच्या श्वासापर्यंत मी चळवळीसोबतच राहेन. सरकारसोबत चर्चा करण्यात आम्हाला रस नाही. आमच्या मुद्द्यांवर काही पावलं उचलली जाणार आहेत का असंही राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळे पाच तारखेच्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

“तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे, मी तिजोरीच उघडली नाही, तर काय घंटा देणार?”

    follow whatsapp