भाजपचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गांच्या अटकेवरून शुक्रवारी मोठं नाट्य रंगलं. बग्गांच्या अटकेवरून पंजाब, हरयाणा आणि दिल्ली पोलीस आमने-सामने आले. त्यानंतर मध्यरात्री उशिरा बग्गांना द्वारका न्यायालयाचे न्यायाधीश सिद्ध त्रिपाठी यांच्या घरी हजर करण्यात आले. न्यायालयाने घरी सोडण्याचे आदेश दिले. दिवसभरानंतर बग्गांची अटक नाट्यातून सुटका झाली.
ADVERTISEMENT
भाजपचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांच्या अटकेवरून पोलीस आणि राजकीय संघर्ष बघायला मिळाला. तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना शुक्रवारी पंजाब पोलिसांनी घरातून अटक केली. पोलीस त्यांना मोहालीला घेऊन निघाले. त्याचवेळी कुरुक्षेत्र येथे हरयाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांना रोखलं.
हरयाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांची बग्गाच्या अटकेबद्दल चौकशी केली. हे सर्व सुरू असताना दिल्ली पोलिसांचं पथक या ठिकाणी पोहोचलं. त्यानंतर हरयाणा पोलिसांनी बग्गांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिलं. बग्गांना पंजाब पोलिसांकडून ताब्यात घेतल्यानंतर परत दिल्लीत आणण्यात आलं.
दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर बग्गांना मध्यरात्री दिल्लीतील द्वारका सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सिद्ध त्रिपाठी यांच्या घरी हजर केलं. न्यायाधीशांनी त्यांना परत घरी पाठवण्याचे आदेश दिले.
बग्गांना पंजाब पोलिसांनी का केली होती अटक?
मार्चमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत बोलताना द कश्मीर फाईल्स चित्रपटावर टीका केली होती. द कश्मीर फाईल्स चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करावा, अशी टीका केजरीवाल यांनी केली होती. त्यानंतर बग्गांनी आक्षेपार्ह ट्विट केलं होतं.
बग्गांच्या ट्विटनंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. मात्र पटियालाच्या पोलीस अधीक्षकांनी या वृत्ताचं खंडण केलं. त्यानंतर बग्गांनी ट्विट करत ‘एक नाही १०० गुन्हे दाखल करा, पण केजरीवाल जर कश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावर हसत असतील, तर मी बोलणारच. यासाठी मी वाटेल त्या गोष्टीचा सामना करायला तयार आहे. मी केजरीवालांना सोडणार नाही. वेसण घालणार.’
यानंतर ३० मार्च रोजी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी केजरीवालांच्या घराबाहेर गोंधळ केला. त्याचवेळी बग्गांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ‘भाजयुमोचे कार्यकर्ते त्यांना जगू देणार नाही.’
२ एप्रिल रोजी बग्गांनी पुन्हा ट्विट करत स्थानिक पोलिसांना कोणतीही सूचना न देता पंजाब पोलीस अटक करण्यासाठी घरी आले होते, अशी माहिती दिली. मी लखनऊमध्ये असल्याचं सांगत बग्गांनी पंजाब पोलीस का अटक करण्यासाठी आली होती, असं म्हणत कारण विचारलं होतं.
३ एप्रिल रोजी बग्गांच्या विरोधात आपचे प्रवक्ते सन्नी आहलुवालियांनी तक्रार दिली. त्यावरून मोहालीमध्ये गुन्हा दाखल झाला. केजरीवाल यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप एफआयआरमध्ये आहे. तक्रारीत बग्गाच्या ट्विटचा संदर्भही दिलेला आहे. याच प्रकरणात बग्गांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती.
याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी पंजाब पोलिसांविरुद्ध तेजिंदर पाल सिंह बग्गा यांचं अपहरण केल्याचा गुन्हाही दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनीच हरयाणा पोलिसांना याची माहिती दिली होती. त्यांनतर हरयाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांना कुरूक्षेत्रमध्ये रोखलं होतं.
भाजपची केजरीवालांवर टीका
भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्तांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. तेजिंदर बग्गांवर जी कारवाई करण्यात आली, ती निंदनीय आहे. पंजाब पोलिसांकडून केजरीवालांनी ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली. त्यांच्या तोंडात कपडा कोंबला गेला.’ तर दुसरीकडे आपनेही भाजपवर टीका केली.
ADVERTISEMENT