वाशिममधल्या बंदलाही हिंसक वळण, दुकानांवर दगडफेक आणि तोडफोड

मुंबई तक

• 07:30 AM • 13 Nov 2021

त्रिपुरामध्ये जी घटना घडली त्याविरोधात अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण लागलं असतानाच आता वाशिममध्येही तशीच घटना घडली. वाशिमच्या कारंजा जिल्ह्यात असलेल्या मुस्लिम बहुल भागातली दुकानं पूर्णपणे बंद होती. मात्र वाशिममध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही लोकांनी त्यांची दुकानं बंद ठेवली नव्हती. त्यामुळे या बंदला हिंसक वळण लागलं. बंद करणाऱ्या आंदोलकांनी ज्या लोकांनी दुकानं बंद ठेवली […]

Mumbaitak
follow google news

त्रिपुरामध्ये जी घटना घडली त्याविरोधात अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण लागलं असतानाच आता वाशिममध्येही तशीच घटना घडली. वाशिमच्या कारंजा जिल्ह्यात असलेल्या मुस्लिम बहुल भागातली दुकानं पूर्णपणे बंद होती. मात्र वाशिममध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही लोकांनी त्यांची दुकानं बंद ठेवली नव्हती. त्यामुळे या बंदला हिंसक वळण लागलं.

हे वाचलं का?

बंद करणाऱ्या आंदोलकांनी ज्या लोकांनी दुकानं बंद ठेवली नव्हती त्यावर दगडफेक केली. त्यामुळे काही दुकानांच्या काचा फुटल्या. तसंच इतर साहित्याचंही नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सोशल मीडियावर या संदर्भातले व्हीडिओही व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

अमरावतीत बंदला हिंसक वळण

अमरावतीत शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराचे शनिवारीही पडसाद उमटले. जमावाकडून करण्यात आलेल्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी भाजपाकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. यावेळी शहरातील राजकमल चौकात दोन्ही बाजूचे जमाव आमने-सामने आला. यावेळी अनियंत्रित झालेल्या दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली.

अचानक दगडफेक सुरु झाल्यानंतर दोन्हीकडील जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याचबरोबर अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. मात्र, या धुमश्चक्रीत समाजकंटकांनी काही दुकानं पेटवून दिली. सध्या अमरावतीतील परिस्थिती नियंत्रणात आली असून, वातावरण तणावपूर्ण आहे.

अमरावतीत कलम 144; पालकमंत्र्यांकडून शांतता पाळण्याचं आवाहन

सलग दुसऱ्या दिवशी दगडफेक, जाळपोळीसह हिंसक घटना घडल्यानं अमरावतीत आता कलम 144 लागू करण्यात आलं आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही नागरिकांना शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे.

‘अमरावतीतील परिस्थिती नियंत्रणाखाली येत आहे. माझी सर्व अमरावतीकरांना विनंती आहे, त्यांनी शांतता आणि संयम पाळावा. माध्यमांनीही दूरचित्रवाणीवर अप्रिय घटनांची दृश्ये दाखवताना त्यावर वेळ नमूद करावी, जेणेकरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं’, असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

‘परिस्थिती चिघळेल अशी प्रक्षोभक वक्तव्ये किंवा सोशल मिडीया पोस्ट कोणीही करू नयेत. अमरावती हे औद्योगिक शहर आहे, या जिल्हाला मोठा सांस्कृतिक-सामाजिक वारसा आहे. अमरावतीच्या लौकिकाला गालबोट लागेल याची काळजी आपण सर्व जण घेऊया,’ असंही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp