ही वेळ आणीबाणीची, सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा: राज ठाकरे

मुंबई: राज्यात मागील चार दिवसापासून बरसणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक भागातील शेतीचं प्रचंड नुकसान केलं आहे. यामुळे बळीराजा अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. विशेषत: मराठवाड्यातील शेतकरी तर पूर्णपणे हतबल झाला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यामुळेच ही वेळ आणीबाणीची असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:00 AM • 30 Sep 2021

follow google news

मुंबई: राज्यात मागील चार दिवसापासून बरसणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक भागातील शेतीचं प्रचंड नुकसान केलं आहे. यामुळे बळीराजा अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. विशेषत: मराठवाड्यातील शेतकरी तर पूर्णपणे हतबल झाला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यामुळेच ही वेळ आणीबाणीची असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

हे वाचलं का?

संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील बऱ्याच भागात पाऊस सातत्याने बरसत आहे. गुलाब चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. अनेक भागाता शेती पिकांसह जमीन खरवडून गेलीय. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरीव मदतीची आवश्यकता आहे. अशी मागणी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी सरकारला एक पत्रक देखील लिहलं आहे.

पाहा राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात काय म्हटलंय:

‘महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे, परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे.’

‘अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला-शेतकऱ्याला 50,000 रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तात्काळ द्यावी. आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीने शेतकरी पार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे.’

Maharashtra Flood : धीर सोडू नका! सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी -उद्धव ठाकरे

‘प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल, परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पाहण्याएवढी ताकद आता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी मी ह्या पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे करत आहे.’ असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे.

हवामान विभागाच्या माहितीप्रमाणमे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाचं रुपांतर आता कमी दाबाच्या पट्ट्यात झालं आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. कमी दाबाच्या राहिलेल्या पट्ट्यामुळे आज मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्यात प्रचंड नुकसान

गुलाब चक्रीवादळाचा परिणाम मराठवाड्यात दिसून आले. मराठवाड्यात दोन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस कोसळत असून, अनेक जिल्ह्यांत पूरपरस्थिती ओढवली आहे. उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, जालना औरंगाबाद, परभणी या जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं आहे.

    follow whatsapp