ग्रामपंचायतीने शोधला जालीम उपाय! उघड्यावर शौचालयास जाणाऱ्यांवर cctv ची नजर

मुंबई तक

• 07:10 AM • 19 Dec 2021

–जका खान, वाशिम रोगराईला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून हागणदारीमुक्त गाव उपक्रम राबवला जातो. मात्र, अजूनही अनेक गावातील चित्र बदललेलं नाही. अनेक ठिकाणी घरी शौचालय असतानाही लोक उघड्यावर शौचालयास जातात. वाशिम जिल्ह्यातील करंजीतही असंच चित्र आहे. उघड्यावर शौचालयास जाणाऱ्यांना ग्रामपंचायतीकडून सूचना देण्यात आल्या. त्यानंतर नोटिसाही बजावल्या. 4 महिन्यांपासून हेच चालू आहे. मात्र, लोकांची सवय कायम असल्याचं […]

Mumbaitak
follow google news

जका खान, वाशिम

हे वाचलं का?

रोगराईला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून हागणदारीमुक्त गाव उपक्रम राबवला जातो. मात्र, अजूनही अनेक गावातील चित्र बदललेलं नाही. अनेक ठिकाणी घरी शौचालय असतानाही लोक उघड्यावर शौचालयास जातात. वाशिम जिल्ह्यातील करंजीतही असंच चित्र आहे. उघड्यावर शौचालयास जाणाऱ्यांना ग्रामपंचायतीकडून सूचना देण्यात आल्या. त्यानंतर नोटिसाही बजावल्या. 4 महिन्यांपासून हेच चालू आहे. मात्र, लोकांची सवय कायम असल्याचं वारंवार निर्दशनास आल्यानंतर सरपंचांनी उपाय शोधला. उपाय आहे सीसीटीव्हीचा!

वाशिम जिल्ह्याच्या करंजी ग्रामपंचायतने मागील 4 महिन्यापासून ग्रामस्थांना वारंवार सूचना दिल्या. नोटिसाही दिल्या तरीही ग्रामस्थांमध्ये सुधारण झाल्याचं ग्रामपंचायतील दिसून आलं. उघड्यावरच शौचालयाला जाण्याबरोबरच नागरिक घाणही आणून टाकत असून, दुर्गंधी पसरून आरोग्य धोक्यात येत आहे. याला आळा घालण्यासाठी करंजी ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल पाटील लहाने यांनी अफलातून शक्कल लढवत चक्क सीसीटीव्ही कॅमेरेच बसविले.

प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा परिषद शाळेसमोर व आरोग्य उपकेंद्रासमोर 2 सीसीटी कॅमेरे बसविले असून, त्याद्वारे सरपंच गोपाल लहाने यांना सर्व मोबाईलवर दिसतं. त्यामुळे आता जे त्या ठिकाणी उगड्यावर शौचालयास जातील वा इतर घाण करताना आढळून येतील त्यांना ग्रामपंचायतीच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. तसंच संबंधित व्यक्तीचं नावही ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर लिहिण्यात येणार आहे.

एक लाख रुपये खर्चातून 2 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरीत 8 कॅमेरे गावात ज्या ठिकाणी घाण होते, त्या ठिकाणी बसविण्यात येणार असल्याचे सरपंच गोपाल पाटील लहाने यांनी सांगितलं. या वेगळ्या प्रयोगामुळे उघड्यावर शौचास जाणारे व इतर प्रकारची घाण करणाऱ्यांना चपराक बसली आहे. ग्रामपंचायतीने हाती घेतलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    follow whatsapp