आम्हाला दंगली घडवता येत नाहीत पण शाळा आणि हॉस्पिटल्स बांधता येतात-अरविंद केजरीवाल

मुंबई तक

08 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:48 AM)

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर आम्हाला दंगली घडवता येत नाहीत पण शाळा आणि हॉस्पिटल्स बांधता येतात असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी नागपूरमध्ये भाजपला टोला लगावला आहे. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती होती. लोकमत या वृत्तपत्राच्या सुवर्ण जयंती कार्यक्रमात ते बोलत आहेत. काय म्हणाले अरविंद केजरीवाल? “देशात एक असा पक्ष आहे की जो कुठे दंगल […]

Mumbaitak
follow google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

हे वाचलं का?

आम्हाला दंगली घडवता येत नाहीत पण शाळा आणि हॉस्पिटल्स बांधता येतात असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी नागपूरमध्ये भाजपला टोला लगावला आहे. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती होती. लोकमत या वृत्तपत्राच्या सुवर्ण जयंती कार्यक्रमात ते बोलत आहेत.

काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

“देशात एक असा पक्ष आहे की जो कुठे दंगल घडो, त्यातल्या गुंडांना आणि लफंग्यांना पक्षात सहभागी करून घेतो. जर तुम्हाला दंगली हव्या असतील तर खुशाल त्यांच्यासोबत जा, जर शाळा आणि हॉस्पिटल्स हवे असतील तर आमच्यासोबत या. आम्हाला शाळा आणि हॉस्पिटल्स बांधता येतात, दंगली घडवता येत नाहीत.” असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

त्यापुढे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे की, “२०२४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकणं हे आमचं लक्ष्य नाही तर आमचं लक्ष्य हे देश आहे. आम्ही आमचं करिअर करण्यासाठी आलो नाही तर करिअर सोडून आलो आहोत. भारतमातेसाठी आम्ही राजकारणात आलो आहोत. सत्ता मिळवण्यासाठी नाही तर देश वाचवण्यासाठी आम्ही राजकारणात आलो आहोत.”

मी देवाकडे दोन गोष्टी मागतो, एक म्हणजे भारत नेहमी जगातील पहिल्या क्रमांकाचा देश राहो. तर दुसरी बाब ही आहे की भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश होत नाही तोपर्यंत मला मृत्यू मिळू नये. मला राजकारण करायचं नाही तर मला फक्त काम करायचं आहे. चोरी करणं, भ्रष्टाचार करणं, दंगली घडवणं, गुंडगिरी करणं हे सगळं आम्हाला जमत नाही. आम्हाला शाळा आणि हॉस्पिटल बांधता येतात.

महाराष्ट्राबाबत काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

महाराष्ट्रातल्या सरकारी शाळांची अवस्था अतिशय वाईट आहे. सुरूवातीला दिल्लीतल्या शाळांमध्ये हीच परिस्थिती होती. आता मात्र दिल्लीत ही स्थिती बदलली आहे. सरकारी शाळांमधला निकाल हा ९७ टक्के इतका आहे. सुमारे चार लाख विद्यार्थी खासगी शाळांमधून सरकारी शाळांमध्ये आले आहेत. महाराष्ट्रात तशी स्थिती नाही असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि आम आदमी पक्षाची भूमिका या विषयावर अरविंद केजरीवाल बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

    follow whatsapp