गेवराईनंतर आता बीड शहरातही दगडफेक, मतदानादिवशी तुफान राडा; धडकी भरवणारा व्हिडीओ

मुंबई तक

02 Dec 2025 (अपडेटेड: 02 Dec 2025, 04:13 PM)

Beed Nagarpalika Election : गेवराईनंतर आता बीड शहरातही दगडफेक, मतदानादिवशी तुफान राडा; संदीप क्षीरसागर यांचं शांततेचं आवाहन; दरम्यान, दुसऱ्यांदा दगडफेक झाल्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

Beed Nagarpalika Election

Beed Nagarpalika Election

Google CTA

बातम्या हायलाइट

point

गेवराईनंतर आता बीड शहरातही दगडफेक, मतदानादिवशी तुफान राडा

point

संदीप क्षीरसागर यांचं शांततेचं आवाहन

बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानादिवशी बीड जिल्ह्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. गेवराईनंतर आता बीड शहरातील शाहूनगर भागात दगडफेकीची गंभीर घटना घडली. मतदान सुरू असताना दोन गट आमने-सामने आल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठल्या कारणावरून वाद उद्भवला हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, हा वाद क्षणात वाढत गेला आणि दगडफेक, ढकलाढकलीपर्यंत पोहोचला.

हे वाचलं का?

दरम्यान, घटनास्थळी तात्काळ पोलीस दल पोहोचले असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या दरम्यान आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्वतः मतदान केंद्राला भेट देत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी शांतता कायम ठेवण्याचं आवाहन करत, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्याची विनंती केली. "निवडणूक लोकशाहीचा उत्सव आहे. कोणताही गोंधळ टाळा आणि पोलिसांना सहकार्य करा," असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

गेवराईमध्ये माजी आमदाराच्या घराबाहेर दगडफेक

दरम्यान, जिल्ह्यातील गेवराईमध्येही सकाळपासून तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. पवार गट आणि पंडित गटातील संघर्षाने हिंसक वळण घेतले. माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोरच दगडफेक झाली. संतप्त जमावाने रस्त्यावर उभ्या वाहनांची तोडफोड करत काचा फोडल्या. तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला. वरिष्ठ अधिकारी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं. राडा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असून तडीपाराचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. "घटना घडवणाऱ्यांवर पोलिसांकडून स्वतःहून गुन्हे दाखल केले जातील. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओंच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली जाईल. मतदान शांततेत होणं आवश्यक आहे. कोणालाही धमक्या, दहशत किंवा गोंधळ निर्माण करण्याचा अधिकार नाही," अशी स्पष्ट भूमिका कावंत यांनी मांडली.

गेवराई आणि बीड शहरात पोलिसांनी अतिरिक्त फोर्स तैनात केला असून मतदान प्रक्रिया सुरक्षितरीत्या पूर्ण करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील दोन्ही घटनांनी राजकीय वातावरण ढवळून निघालं असून उर्वरित मतदान शांततामय होण्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Buldhana Nagarpalika election : "बोगस मतदार पकडला, स्थानिकांनी हाणला, आमदार पुत्राच्या मदतीने पळाला"