Devendra Fadnvais on Sunil Prabhu : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना विरोधकांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. विशेषतः शिवसेना (ठाकरे) गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी राज्याच्या वाढत्या कर्जाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक उदाहरणाद्वारे प्रत्युत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानभेत थेट सुनील प्रभुंच्या संपत्तीचा आकडा सांगितला. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसांनी सुनील प्रभूंच्या संपत्तीचा आकडा सांगितला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "प्रभू साहेब मी तुमचे निवडणुकीचे अॅफिडेविट तपासले. तुमच्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती 14 कोटी आणि कर्ज 3 कोटी 54 लाख रुपये असल्याचे नमूद केले आहे. कर्जाचा विचार केल्यास तुमच्यावर 25.28 टक्के दायित्व आहे. एवढ्या दायित्वामुळे तुम्ही कर्जबाजारी होणार का? तुम्हाला नादारी घोषित करावी लागणार का? हे शक्यच नाही. प्रभू यांना एवढ्याशा कर्जामुळे नादारी घोषित करावी लागणार नाही. त्याचप्रमाणे राज्यावर 18 टक्केच कर्ज आहे. त्यामुळे प्रभू यांच्यापेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती थोडी उत्तम आहे."
हेही वाचा : 'अहो, मला भजी खायची आहेत..', नवऱ्याला कॅन्टीनमध्ये पाठवलं, अन् नवविवाहिता इमरानसोबत पळून गेली!
राज्याच्या वाढत्या आर्थिक ताकदीचे विश्लेषण करताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची जागतिक स्तरावरील देशांशी तुलना केली. जर महाराष्ट्र एक स्वतंत्र देश असता, तर तो जगातील 30 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला असता, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या आपण नॉर्वे, थायलंड, फिलिपिन्स आणि ऑस्ट्रिया यांसारख्या विकसित देशांना मागे टाकले असून, विकासाचा हाच वेग कायम राहिल्यास येत्या दोन ते तीन वर्षांत UAE आणि सिंगापूरसारख्या देशांच्या अर्थव्यवस्थांनाही महाराष्ट्र मागे टाकेल, असा दावा फडणवीस यांनी केला.
राज्याच्या विकासदराबाबत सविस्तर माहिती देताना फडणवीस यांनी गेल्या दशकातील प्रगतीचा आलेख मांडला. 2013-14 मध्ये राज्याचे सकल उत्पन्न (GSDP) 16 लाख कोटी रुपये होते, जे गेल्या 10 वर्षांत तब्बल तीन पटीने वाढून 51 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ही वाढ राज्याच्या प्रगतीची साक्ष देणारी असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांनी केवळ कर्जाचा आकडा न पाहता अर्थव्यवस्थेच्या विस्ताराकडे लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
दरडोई उत्पन्नाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मान्य केले की, महाराष्ट्र या बाबतीत देशात पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र, राज्याचे विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र आणि मोठी लोकसंख्या विचारात घेता हा विकासदर अत्यंत समाधानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. साधारणपणे मोठ्या राज्यांचा विकासदर कमी असतो, तरीही महाराष्ट्राने आपली घोडदौड कायम राखली आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न 3 लाख 17 हजार रुपयांवरून 3लाख 47 हजार 903 रुपयांपर्यंत वाढले असून, ही राज्यासाठी सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
लक्झरी कारमधून भीक मागण्यासाठी यायचा, शिफ्टमध्ये काम अन् लाखो रुपयांची कमाई, दुबईतील भिकाऱ्याला अटक
ADVERTISEMENT











