एकनाथ शिंदे यांना हा दावा मान्य आहे? नसेल तर…; संजय राऊतांचा चॅलेंज

मुंबई तक

11 Apr 2023 (अपडेटेड: 11 Apr 2023, 10:12 AM)

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी आणि बाळासाहेब ठाकरेंबद्दल विधान केलं. यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे.

sanjay raut gets angry after chandrakant patil statement on babri mosque demolition

sanjay raut gets angry after chandrakant patil statement on babri mosque demolition

follow google news

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा बाबरी पाडण्याशी संबंध नाही, असं विधान केलं. त्यांच्या विधानावरून ठाकरे गट आक्रमक झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांना खुलं आव्हान दिलं आहे. राऊतांनी पुन्हा एकदा राजीनाम्याचा विषय छेडला आहे.

हे वाचलं का?

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे गटावर टीकास्त्र डांगलं. राऊत म्हणाले, “हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा बाबरी पाडण्यात कोणतीही भूमिका नाही, त्यांनी काही सरदार पाठवले नव्हते, असं ते (चंद्रकांत पाटील) म्हणताहेत. आता यावर जे त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसले आहेत. त्यांची नाडी पकडून अयोध्येत हातात धनुष्यबाण घेऊन फिरत होते. त्या डॉ. मिस्टर मिंधे आणि 40 लोकांचं काय म्हणणं आहे? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार, आमचीच खरी शिवसेना, हिंदुत्वासाठी आम्ही शिवसेना सोडली, हे जे ते तीर मारत असतात, त्यांच्याकडून मला प्रतिक्रिया अपेक्षित आहे.”

हेही वाचा >> ‘बाबरी पाडण्याशी बाळासाहेबांचा, शिवसेनेचा संबंध नाही’, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना गुलाम संबोधत राऊतांनी सुनावलं आहे. “बाळासाहेब ठाकरे यांचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कुणी दाखवली नव्हती. ती तुम्ही गुलाम झाल्यामुळे, शिवसेना फोडल्यामुळे चंद्रकांत पाटील आणि भाजपचे लोक शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करत आहेत. यावर मुख्यमंत्र्यांची (एकनाथ शिंदे) प्रतिक्रिया अपेक्षित आहे, हिंमत असेल तर कारण ते गुलाम आहेत आणि गुलामाला हिंमत नसते”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पळपुट्टे म्हणत शिंदे आणि 40 आमदारांवर टीका

“बाबरी तोडली आणि त्यानंतर भाजपने पलायन केलं, हा इतिहास आहे. ‘बाबरी तोडणारे आमचे, भाजपचे किंवा अन्य कुणी नव्हते. ते शिवसैनिक होते, हे भाजपचे तेव्हा राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी जाहीरपणे सांगितले. त्यानंतर बाळासाहेबांनी सांगितलं की होय. तुम्ही जरी पळून गेला असला आणि बाबरी तोडणारे शिवसैनिक असतील, तर मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे. आम्ही पळपुटे नव्हतो आणि नाही. ज्या पळपुट्ट्यांना घेऊन सरकार बनवलं आहे भाजपनं. त्यांची हिंमत इतकी वाढली आहे की, ते आता बाळासाहेब ठाकरे, आमचे दैवतावर ते चिखलफेक करू लागले आहेत. त्या चिखलात बसून डॉ. मिंधे आणि 40 आमदार सत्ता भोगत आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

चंद्रकांत पाटलांचं विधान ही भाजपची भूमिका, राऊत काय म्हणाले?

“चंद्रकांत पाटील जे बोलले आहेत, ते चंद्रकांत पाटील यांच्या मुखातून भाजप बोलला आहे. त्यांना माहिती आहे की मिंधे तोंड उघडणार नाही. बोललं पाहिजे. मी तर म्हणेन राजीनामे द्या. निषेध म्हणून. आहे का हिंमत, नसेल तर शिवसेना आणि हिंदुत्वाचं नाव घ्यायचा अधिकार तुम्हाला नाही. जाहीर करा की, भाजपच्या सत्तेत सामील झालेले गुलाम आणि मिंध आहोत. नाहीतर राजीनामे द्या सत्तेतून”, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं.

संजय राऊत यांचा ट्विट’वार’

संजय राऊत यांनी एक ट्विटही केलं आहे. ज्यात ते म्हणतात, “अयोध्या आंदोलनात शिवसेना नव्हतीच, हा दावा भाजपा करत आहे. शिंदे यांना हा दावा मान्य आहे? नसेल तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा. मिंधे गटात कोणी खऱ्या आईचे दुध प्यायलेला आहे का, जो शिवसेनाप्रमुखांच्या अपमानाविरोधात मंत्री पदाचा राजीनामा देईल?”, असा सवाल राऊतांनी केला आहे.

    follow whatsapp