अर्जुन पुरस्कार विजेते आणि भारताचे माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी पुण्यात राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू अशी नाटेकर यांची ओळख होती. नाटेकर यांच्या पश्चात त्यांचा मुलगा गौरव व दोन मुली आहेत.
ADVERTISEMENT
“गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज सकाळी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला, आम्ही सर्वजण त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या सोबतच होतो.” नाटेकर यांचा मुलगा गौरवने पीटीआयला ही माहिती दिली. सध्या कोरोनाचे नियम लक्षात घेता नाटेकर यांच्यावर मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
१९५६ साली नाटेकर यांनी मलेशियात Sellanger International स्पर्धा जिंकली होती. १९५४ साली मानाच्या All England Championships स्पर्धेतही त्यांनी उपांत्यपूर्वी फेरीपर्यंत धडक मारली होती. आपल्या काळातले सर्वात प्रसिद्ध खेळाडू म्हणून ओळख असलेल्या नंदू नाटेकर यांनी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली होती. १०० पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन नाटेकर यांनी अनेक बक्षीस मिळवली होती.
वाढत्या वयोमानानुसार त्यांना व्याधींनी ग्रासलं होतं.१९५१ ते १९६३ या कालावधी मानाच्या Thomas Cup स्पर्धेत नाटेकर यांनी १६ पैकी १२ एकेरी तर १६ पैकी ८ दुहेरी सामने जिंकले होते. १९६५ साली जमैकात झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्येही नाटेकर यांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. सांगली येथे जन्म झालेल्या नाटेकर यांनी १५ वर्ष आपली कारकिर्द गाजवली. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना १९६१ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT











