टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आल्यानंतर अनेक नाराज भारतीय चाहत्यांनी आयपीएलच्या आयोजनाला याचा दोष दिला. काही खेळाडूंनीही गेले ६ महिने आपण घराबाहेर असून Bio Bubble मुळे येणाऱ्या थकव्याबद्दल भाष्य केलं होतं.
ADVERTISEMENT
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही Bio Bubble मुळे येणाऱ्या थकव्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
“होय नक्कीच, प्रश्नच येत नाही. यापैकी अनेक खेळाडू हे ६ महिने झाले घरीच गेले नाहीयेत. गेल्या दोन वर्षांमध्ये हे खेळाडू जास्तीत जास्त २५ दिवस आपल्या घरी राहिले असतील. खेळाडू देखील माणसंच आहेत. ज्यावेळी तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं त्यावेळी महत्वाच्या क्षणांमध्ये तुमच्यातली उर्जा निघून जाते. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात नेमकं हेच झालं.” बायो बबलच्या थकव्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला का या प्रश्नाला उत्तर देताना रवी शास्त्री बोलत होते.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचा अंतिम सामना खेळायला गेलेली टीम इंडिया त्यानंतर इंग्लंड दौरा, आयपीएल असा भरगच्च कार्यक्रम समोर ठेवून खेळली. ज्यामुळे अनेक खेळाडूंना आलेला थकवा टी-२० विश्वचषकात पहिल्या दोन सामन्यांमध्ये दिसून आला.
टी-२० विश्वचषकाआधी आयपीएलचा उर्वरित भाग खेळवणं हे भारतीय संघासाठी योग्य ठरलं नाही असंही रवी शास्त्री इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलले. “आयपीएलमुळे भारताचा पराभव झाला असं मी बोलणार नाही. एप्रिल महिन्यात स्पर्धा कॅन्सल झाल्यामुळे त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. पण भविष्यात असं होईल असं मला वाटत नाही. परंतू स्पर्धेचं वेळापत्रक आखताना सर्वच क्रिकेट बोर्डांना या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे.”
रविवारी जे दोन संघ अंतिम सामना खेळणार आहेत, ते गेल्या काही दिवसांमध्ये फार कमी क्रिकेट खेळले आहेत. परंतू त्यांनी योग्य प्रमाणात सामने खेळून स्वतःमधली उर्जा कायम ठेवली असंही रवी शास्त्री म्हणाले.
T20 World Cup : ICC स्पर्धा न जिंकल्याचं दुःख आहेच पण पश्चाताप नाही – माजी प्रशिक्षक रवी शास्त्री
ADVERTISEMENT