युएईत पार पडणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या सामन्याची तारीख जाहीर झाली आहे. २४ ऑक्टोबरला दुबईच्या मैदानावर हे दोन्ही संघ समोरासमोर येणार आहेत. ANI शी बोलत असताना विश्वसनीय अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ADVERTISEMENT
गेल्याच महिन्यात आयसीसीने युएईत पार पडणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी गटवारी जाहीर केली होती. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या काळात खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला अखेरचा सामना २०१९ विश्वचषकादरम्यान झाला होता, ज्यात विराट कोहलीच्या संघाने पाकिस्तानवर मात केली होती.
भारतात कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा युएई आणि ओमानला भरवली आहे. स्पर्धेचं ठिकाण बदललं असलं तरीही स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क हे बीसीसीआयकडेच राहणार आहेत. सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय खेळाडू आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी युएईला रवाना होतील. त्यानंतर याच ठिकाणी टी-२० विश्वचषक पार पडेल.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांना दुसऱ्या गटात स्थान मिळालेलं असून याच गटात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचाही समावेश असणार आहे. याव्यतिरीक्त पात्रता फेरी जिंकणाऱ्या दोन संघांनाही या गटात स्थान मिळणार आहे. पहिल्या गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या संघांना स्थान देण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT











