विराट म्हणाला संघातले तरुण खेळाडू अनिल कुंबळेला घाबरुन असायचे – माजी CoA प्रमुख विनोद राय

मुंबई तक

• 10:41 AM • 05 Apr 2022

२०१७ च्या चॅम्पिअन्स ट्रॉफी दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यात भारताला स्विकारावा लागलेला मानहानीकारक पराभव आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातला वाद चांगलाच गाजला होता. या दोघांच्याही वादावर अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. आज या कथित वादावर बीसीसीआयच्या Committee of Administrators (CoA) चे माजी प्रमुख विनोद राय यांनी महत्वाचं स्पष्टीकरण दिलं […]

Mumbaitak
follow google news

२०१७ च्या चॅम्पिअन्स ट्रॉफी दरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यात भारताला स्विकारावा लागलेला मानहानीकारक पराभव आणि त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातला वाद चांगलाच गाजला होता. या दोघांच्याही वादावर अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या. आज या कथित वादावर बीसीसीआयच्या Committee of Administrators (CoA) चे माजी प्रमुख विनोद राय यांनी महत्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे.

हे वाचलं का?

Not Just a Nightwatchman — My Innings in the BCCI या आपल्या आगामी पुस्तकात विनोद राय यांनी विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वादाबद्दल माहिती दिली आहे. या दोघांमधील वाद प्रसारमाध्यमांसमोर आल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आली असती असंही राय यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.

विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातले संबंध चांगले नव्हते हे विनोद राय यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलं आहे. “मी ज्यावेळी कॅप्टन आणि टीम मॅनेजमेंटशी संवाद साधला तेव्हा मला असं सांगण्यात आलं की कुंबळे हा खूप शिस्तप्रिय होता आणि त्यामुळे काही खेळाडू त्याच्यावर नाराज होते. मी याबद्दल नंतर विराट कोहलीशी बोललो त्यावेळी त्याने मला सांगितलं की अनिल कुंबळे ज्या पद्धतीने खेळाडूंशी वागतो ते पाहून संघातील काही तरुण खेळाडू हे अनिल कुंबळेला घाबरुन असतात”.

अनिल कुंबळेने CoA ला दिलेल्या स्पष्टीकरणात, मी संघाच्या हितासाठी जे योग्य आहे त्या पद्धतीने वागत आल्याचं सांगितलं. निर्णय घेण्याआधी काही खेळाडूंना असलेल्या प्रॉब्लेमऐवजी मी मुख्य प्रशिक्षक म्हणून केलेल्या यशस्वी कामगिरीचा विचार केला जावा असं सांगितलं. आपल्या पुस्तकात राय यांनी अनिल कुंबळेसोबत झालेल्या संभाषणाचाही दाखला दिला आहे.

“UK वरुन परतल्यानंतर मी आणि अनिल कुंबळेने या प्रकरणात सविस्तर चर्चा केली. विराट आणि त्याच्यामध्ये झालेल्या वादाबद्दल बाहेर ज्या पद्धतीने चित्र रंगवण्यात आलं त्यावरुन अनिल कुंबळे नक्कीच नाराज होता. अनिलच्या मते त्याला या प्रकरणात योग्य ती वागणूक दिली जात नाही, कर्णधार किंवा संघाला महत्व देण्याची गरज नाही. एखाद्या संघात शिस्त आणि प्रोफेशन दृष्टीकोन आणणं ही मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी असते आणि एक सिनीअर खेळाडू म्हणून संघातील खेळाडूंना माझा आदर करणं गरजेचं आहे”, असं राय यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.

या वादावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन CAC (Cricket Advisory committee) ने लंडनमध्ये कुंबळे आणि कोहली या दोघांशीही स्वतंत्र चर्चा केली. दोघांमधला वाद इतका टोकाला गेल्यामुळे इतर अधिकाऱ्यांना या प्रकरणात CAC मधील सदस्य गांगुली, तेंडुलकर आणि लक्ष्मण यांनी लक्ष घालावं असं वाटलं. त्या पद्धतीने तिन्ही सदस्यांनी कोहली-कुंबळेशी चर्चाही केली. या चर्चेनंतर CAC ने पुन्हा एकदा अनिल कुंबळेला प्रशिक्षकपदी नेमण्याचा सल्ला दिला होता. परंतू यानंतर अनिल कुंबळेने स्वतःच पायउतार होण्याचं ठरवल्याचं राय यांनी म्हटलं आहे.

सचिन तेंडुलकर रमला जुन्या आठवणीत, शिवाजी पार्कच्या BEST बसमध्ये खास फोटोसेशन

    follow whatsapp