मालवणीत संभाजीनगरची पुनरावृत्ती टळली! शोभायात्रेदरम्यान काय घडलं?
मुंबई उपनगरातील मालाड परिसरातील मालवणी भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हालचाली केल्यानं छत्रपती संभाजीनगरमधील घटनेची पुनरावृत्ती टळली.
ADVERTISEMENT

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचाराची पुनरावृत्ती मालाडमधील मालवणी भागात होता होता टळली. पोलिसांनी वेळीच कृती केल्याने तणावपूर्ण स्थिती नियंत्रणात आली. मालाडमधील मालवणी भागात राम नवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रा जात असताना अचानक तणाव निर्माण झाला होता. या घटनेत एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती झोन 11 पोलीस उपायुक्त अजय कुमार बन्सल यांनी दिली.
गुरुवारी (30 मार्च) मालवणी भागात राम नवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. यात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. शोभायात्रा एका मशिदीसमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. यात्रेदरम्यान एका तरुणाने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं होतं.
हेही वाचा – राम नवमीदिवशी दुर्दैवी घटना, 35 भाविकांचा विहरीत पडून मृत्यू; नेमकं काय झालं होतं?
वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी लागलीच कृती केली आणि परिस्थिती पूर्ववत केले. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही जणांवर पोलिसांनी लाठीचार्जही केला. पोलिसांनी वेळीच लक्ष दिल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचाराची पुनरावृत्ती मालवणी टळली.

मोठ्या आवाजात गाणे वाजण्याला आक्षेप?
पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने आपल्या वृत्ता म्हटलं आहे की, शोभायात्रा पुढे जात असताना काही जणांनी डीजेवर वाजवल्या जात असलेल्या मोठ्या आवाजातील गाण्यांवर आक्षेप घेतला. त्यामुळे दोन गट आमने सामने आले होते. दरम्यान, यावेळी दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आयोजकांकडून करण्यात आला, पण असं काही घडलं नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले.