उत्तर प्रदेश निवडणुकीत ‘शिवसेना व औरंगाबाद’ची चर्चा; औवेसी सभांमधून देताहेत उदाहरण

निरंजन छानवाल

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादची चर्चा होत आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांच्यामुळे उत्तर प्रदेशात औरंगाबाद चर्चेत आलं असून, भाजपचा पराभव करण्यासाठी औवेसी त्यांच्या सभांमधून मतदारांना औरंगाबादमधील विजयाचं उदाहरण देत आहेत.

‘औरंगाबादमध्ये २१ वर्षांपासून असलेल्या शिवसेनेच्या खासदाराचा एआयएमआयएमने पराभव केला.’ ‘औरंगाबादमध्ये आम्ही मुस्लिम मिळून पराभूत करू शकतो, तर इथे तर शिवसेनेचा छोटा भाऊ भाजपला हरवू शकत नाही का?’ ही विधानं आहेत खासदार असदुद्दीन औवेसी यांची.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील हे एमआयएमच्या तिकीटावर लोकसभेत गेले. खासदार जलील यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. याच विजयाचा आधार घेत औवेसी सध्या उत्तर प्रदेशात प्रचार करताना दिसत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर औवेसींनी लक्ष्य केंद्रीत केलं असून, आता ते उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी करत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

असदुद्दीन औवेसी यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या शंभर जागा लढवण्याची घोषणा केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने औवेसींनी प्रचारही सुरू केला असून, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेसच्या सरकारांवर निशाणा साधताना दिसत आहेत. हे सगळं करत असतानाच औवेसी वारंवार आपल्या भाषणांमध्ये औरंगाबादचा उल्लेख करताना दिसत आहेत.

दुसरीकडे मुस्लिम लोकसंख्येचा उल्लेख करत मुस्लिम मुख्यमंत्री बनवण्याचंही आवाहन करत आहेत. ‘११ टक्के लोकसंख्या असलेले यादव अखिलेश यांना मुख्यमंत्री बनवू शकतात, तर १९ टक्के असलेले मुस्लिम का बनवू शकत नाही?’, असंही ते म्हणताना दिसत आहेत.

ADVERTISEMENT

औवेसी औरंगाबादचा उल्लेख का करत आहेत?

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. मुस्लिम मतदारांना एमआयएमकडे ओढण्यासाठी सध्या औवेसी प्रयत्न करताना दिसत आहेत. मुस्लिम उमेदवारांना जिंकून आणू शकतो, असा विश्वास औवेसी मुस्लिम मतदारांमध्ये निर्माण करत आहेत, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळेच ते वारंवार औरंगाबादमध्ये शिवसेनेला पराभूत केल्याचं उदाहरण देत आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमला चांगलं यश मिळालं. सीमांचलमधील ५ जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. या विजयाचाही उल्लेख औवेसी करत आपल्या भाषणामधून करत असून, शिवसेनेचं उल्लेख करून भाजपविरोधी चेहरा असल्याचं मतदारांना सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

२०२४ च्या लोकसभेच्या निवडणूक होण्यापूर्वी सगळ्यांचं लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीकडे लागलेलं आहे. उत्तर प्रदेशात भाजपने सत्ता टिकवण्यासाठी पुन्हा एकदा जोर लावला आहे. तर इतर पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. यात खासदार असदुद्दीन औवेसी यांनीही प्रचारात झोकून दिलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT