अमरावतीमध्ये झालेल्या दंगलीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अमरावतीत दंगल भडकवण्यासाठी भाजपला जबाबदार धरलं. माजी मंत्री अनिल बोंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर आता बोंडे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार जर कधीच खोटं बोलत नसतील असं संजय राऊतांचं म्हणणं असेल तर हे म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही असं म्हटल्यासारखं आहे, असं बोंडे म्हणाले. अमरावतीत झालेल्या हिंसाचाराला भाजप नेते जबाबदार असल्याचा आरोप शरद पवार आणि संजय राऊतांनी केला होता. त्या आरोपांना बोंडे यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं.
आपल्या ट्विटर स्पेसवर बोलत असताना बोंडे यांनी भाजप सरकार आहे तिकडे दंगली होत नाहीत असं वक्तव्य केलं होतं. आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोंडे यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं.
“मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, मी मलिकांसारखा हर्बल तंबाखू किंवा दारु पिऊन बोलत नाही. जिथे जिथे भाजपचं सरकार आहे तिथे दंगली घडत नाहीत. जिथे डाव्या व सेक्युलर विचाराच्या सरकारच्या राज्यात ह्या दंगली होतात. कारण ह्या दंगलीला प्रोत्साहन देण्याचं काम हे सरकार करीत असते.”
दरम्यान दंगलीच्या पार्श्वभूमीवर अमरावती आणि अकोल्यात जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत.