
पालघर : टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं आज अपघाती निधन झालं, ते 54 वर्षांचे होते. पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान पालघरजवळील चारोटी गावाजवळ हा अपघात झाला.
सायरस मिस्त्री अहमदाबाद-मुंबई महामार्गावरून मर्सिडीजने (MH-47-AB-6705) मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. सुर्या नदीच्या पुलावर त्यांची गाडी डिव्हायडरला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की मिस्त्री यांच्यासह अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले, असेही पाटील यांनी सांगितले.
अपघातग्रस्त गाडीमध्ये सायरस मिस्त्री यांच्यासह केपीएमजी ग्लोबल स्ट्रेटेजी ग्रुपचे संचालक जहांगीर पंडोले, जेएम फायनान्शियल प्रायव्हेट इक्विटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दरायस पंडोले आणि ब्रीचकँडी रुग्णालयातील ख्यातनाम स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनाहिता पंडोले असे चार जण प्रवास करत होते.
हे सर्वजण गुजरातमधील उदवाडा इथे देवदर्शनासाठी गेले होते. वलसाड जिल्ह्यातील उदवाडा हे पारसी समुदायासाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. ज्याप्रमाणे हिंदू धर्मियांमध्ये काशी हे पवित्र स्थान मानले जाते अगदी तेच स्थान पारसी समुदायासाठी उदवाडाचे आहे. इथेच पारसी समुदायाच्या धर्मगुरुंचे वास्तव्य आहे.
याच ठिकाणाहुन सायरस मिस्त्री आणि अन्य तिघे मर्सिडीज गाडीने मुंबईच्या दिशेने परत येत होते. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी अनाहिता पंडोले गाडी चालवत होत्या. तर त्यांचे पती दरायस पंडोले हे त्यांच्या शेजारी बसले होते. सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले गाडीत मागील बाजूस बसले होते. दरम्यान, गाडी अहमदाबाद-मुंबई महामार्गावर पालघरनजिक चारोटी गावाजवळ आली असताना सुर्या नदीच्या पुलावर डिव्हायडरला धडकली, आणि यात मागे बसलेल्या मिस्त्रींसह जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला.