राज ठाकरे म्हणतात, नाणार प्रकल्प राज्याबाहेर जाणं परवडणारं नाही!

मुंबई तक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कोकणातील रत्नागिरी-राजापूर रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा चर्चेत आणला आहे. कोरोनानंतर राज्याच्या अर्थकारणाला गती द्यायची असेल तर रत्नागिरी-राजापूर रिफायनरीसारखे प्रकल्प हातातून गमावणं राज्याला आणि कोकणाला परवडणारं नसल्याचं पत्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लिहीलं आहे. कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा कोकणातील रत्नागिरी-राजापूर रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा चर्चेत आणला आहे. कोरोनानंतर राज्याच्या अर्थकारणाला गती द्यायची असेल तर रत्नागिरी-राजापूर रिफायनरीसारखे प्रकल्प हातातून गमावणं राज्याला आणि कोकणाला परवडणारं नसल्याचं पत्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लिहीलं आहे.

चार पानी पत्रामध्ये राज ठाकरे यांनी कोकणातील स्थानिकांना रोजगार देण्याच्या दृष्टीकोनातून प्रकल्प महत्वाचा असल्याचं म्हटलं आहे. प्रत्येकवेळी कोकणाचा कॅलिफोर्निया होणार असं आपण ऐकत असतो. परंतू कोकणाला कुठल्याच मॉडेलची गरज नाहीये. उलट कोकण हेच जगातलं विकासाचं उत्कृष्ट मॉडेल बनू शकतं. या दृष्टीने आतापर्यंत समग्र विचार झाला नाही पण यापुढे हा विचार व्हायला हवा असं राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हणलं आहे.

कोकणातील तरुण नोकरी-धंद्यासाठी मुंबई-पुण्याची वाट धरावी लागत आहे. पर्यटन कोकणाचं भवितव्य बदलू शकतं, परंतू यादृष्टीने विचार झालाच नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. रत्नागिरी-राजापूर रिफायनरी प्रकल्पांमुळे उद्योग निर्माण होतील आणि स्थानिक तरुणांना इथे जास्तीत जास्त संधी मिळेल. प्रकल्पाशी संबंधित पर्यावरणीय चिंता मी देखील समजू शकतो. परंतू जैतापूर प्रकल्पाच्या वेळी मी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्याशी बोलून माझ्या मनातल्या शंका दूर केल्या. याच पद्धतीने तज्ज्ञांशी संवाद साधून कोकणाचं पर्यावरणाच्या दृष्टीने नुकसान होणार नाही हे पहायला हवं असंही राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

जो प्रकल्प रोजगाराच्या अमर्याद संधी पुढे आणेल तो स्विकारणं ही आजची गरज आहे. कोकणातील तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. कोकणातील तरुणांकडे प्रचंड बुद्धीमत्ता आणि क्षमता आहे. त्यामुळे कोकणवासियांच्या संधीच्या आड कोणी येत असेल तर त्या लोकांनी मनसेशी संघर्षाची तयारी ठेवावी असा इशाराही राज ठाकरेंनी नाव न घेता शिवसेनेला दिला आहे. शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध होता. नाणार प्रकल्पाविरोधात झालेल्या आंदोलनात शिवसेनेनीह सहभाग नोंदवला होता.

राज्य सरकारने याप्रकरणी सामंजस्याची भूमिका घेऊन तज्ज्ञांच्या मदतीने स्थानिकांचं मत बदलावं. हे करत असताना संघर्षाची भूमिका अजिबात घेऊ नये. कोरोनानंतर राज्याच्या अर्थकारणाला गती देणं गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प बंगळुरुला गेला. ही बातमी अत्यंत क्लेशदायक होती. आसपासची राज्य महाराष्ट्राचे उद्योग पळवून न्यायला टपून बसलेली असताना महाराष्ट्राने तीन लाख कोटींचा प्रकल्प गमावू नये…असं करणं राज्याला परवडणारं नाही असं म्हणत राज ठाकरेंनी पत्रात आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना या प्रकल्पावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

नाणार रिफायनरीवर शिवसेनेच्या नेत्यांनी यु-टर्न घेतला होता का? –

हे वाचलं का?

    follow whatsapp