प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला एक संशयित स्कॉर्पिओ आढळली होती. या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनच्या कांड्या आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतू शुक्रवारी या संशयित स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आहे. सकाळी १० वाजून २५ मिनीटांनी हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येखील खाडीतून बाहेर काढण्यात आला. रात्री उशीरा हिरेन यांच्या मृतदेहावर पोस्ट मार्टम पूर्ण करण्यात आलं.
मनसुख हिरेन प्रकरणात पोस्ट मार्टम पूर्ण, ठाणे पोलीस म्हणतात…
दरम्यान या घटनेनंतर मनसुख हिरेन हे नेमके होते तरी कोण आणि मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्याशी त्यांचे नेमके काय संबंध होते यावरुन चर्चांना उधाण आलेलं आहे. मनसुख हिरेन हे मुळचे ठाण्याचे रहिवासी होते. डॉ. आंबेडकर रोडवरील विकास पाम या सोसायटीत १४ व्या माळ्यावर हिरेन यांचं घर आहे. गेल्या १२ ते १५ वर्षांपासून हिरेन ठाण्यात राहत होते, त्यांच्यामागे ३ मुलं आणि पत्नी असा परिवार आहे. हिरेन यांचं ठाण्याच्या नौपाडा भागात कारच्या पार्ट्सचं दुकानं होतं. हिरेन यांचं स्वतःचं कारच्या पार्ट्सचं दुकान असलं तरीही ते स्कुटरवरुन प्रवास करायचे.
मुंब्रा खाडीत हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत होता. परंतू त्यांच्या पत्नीने हिरेन हे चांगले स्विमर होते. सोसायटीतल्या स्विमींग पूलमध्ये हिरेन आपल्या मुलांसह अन्य मुलांनाही पोहायला शिकवायचे. त्यामुळे हिरेन हे आत्महत्या करु शकणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नीने दिली.
‘पती आत्महत्या करु शकत नाही’, मनसुख हिरेनच्या पत्नीची प्रतिक्रिया
घटनेच्या एक दिवस आधी मनसुख हिरेन सकाळी ८ वाजून २० मिनीटांनी घराबाहेर पडले. यानंतर रात्रभर मनसुख घरी परतलेच नाही. चिंतेत पडलेल्या परिवारातील सदस्यांनी थोडावेळ वाट पाहण्याचं ठरवलं. परंतू दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मनसुख यांचा काहीच पत्ता लागत नसल्यामुळे अखेरीस कुटुंबाने नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. याच दिवशी सकाळी सव्वा दहा वाजल्याच्या सुमारास हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथीळ खाडीत सापडला होता.