फडणवीसांच्या वक्तव्यानंतर वारिशेंची हत्या, योगायोग समजावा का?: राऊत

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sanjay Rauts letter: मुंबई: नाणार रिफायनरीविरुद्ध (Nanar Refinery) बातमी देणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिशे (shashikant warishe) यांच्या हत्या प्रकरणाने पूर्णपणे वेगळं वळण घेतलं आहे. रिफायनरीविरुद्ध बातमी दिल्यानेच वारिशे यांची हत्या केल्याचा आरोप वारिशेंचे कुटुंबीय आणि आता विरोधक करु लागले आहेत. या सगळ्यात शिवसेना (UBT) (Shivsena) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पत्र लिहत त्यांच्यावरच एक प्रकारे आरोप केले आहेत. (after fadnavis statement should killing of shashikant warishe be considered a coincidence sanjay rauts letter stirs up excitement)

‘4 फेब्रुवारी 2023 रोजी कोकणातील आंगणेवाडी जत्रेत भारतीय जनता पक्षाची एक जाहीर सभा झाली. त्या सभेत आपण ठासून सांगितले की, नाणार येथे रिफायनरी होणारच. कोण अडवतेय ते पाहू व आपल्या वक्तव्यास चोवीस तास उलटत नाही तोच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली. हा फक्त योगायोग समजावा का?’ असा सवाल राऊतांनी यावेळी केला आहे.

आता राऊतांच्या या पत्राचा रोख नेमका कोणाकडे आहे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Crime : सकाळी बातमी आली, दुपारी गाडीने उडवलं; हा पत्रकाराचा खूनच! कोणी केला आरोप?

पाहा संजय राऊतांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय

राज्याचे गृहमंत्री म्हणून ढासळणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. आपल्यासारख्या प्रशासनाचा मोठा अनुभव असलेल्या नेत्याकडे गृह विभागाचे नेतृत्व असताना राज्यात दिवसाढवळ्या खून पडावेत व संबंधित गुन्हेगारांना राजाश्रय मिळावा, हे चिंताजनक आहे.

ADVERTISEMENT

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील तरुण पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या करण्यात आली. या हत्येस अपघाताचे स्वरूप दिले असले तरी ही हत्याच आहे. पत्रकार वारिशे हे कोकणात येऊ घातलेल्या रिफायनरीविरुद्ध सातत्याने आवाज उठवत होते. ते याबाबत लिखाण करीत होते. रिफायनरीस कोकणातील जनतेचा विरोध आहे. जरी आपले याबाबत वेगळे मत असले तरी स्थानिक जनता या रिफायनरीविरुद्ध संघर्ष करीत आहे व शशिकांत वारिशेसारखे पत्रकार रिफायनरीविरुद्ध लोकांना जागृत करीत होते, हे सत्य नाकारता येणार नाही. त्या वारिशे यांची हत्या होणे ही महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेस कलंक लावणारी घटना आहे. मी खालील दोन गोष्टींकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.

ADVERTISEMENT

1. दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी कोकणातील आंगणेवाडी जत्रेत भारतीय जनता पक्षाची एक जाहीर सभा झाली. त्या सभेत आपण ठासून सांगितले की, नाणार येथे रिफायनरी होणारच. कोण अडवतेय ते पाहू व आपल्या वक्तव्यास चोवीस तास उलटत नाही तोच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली. हा फक्त योगायोग समजावा का?

2. महाराष्ट्रात घटनाबाह्य सत्तांतर झाल्यानंतर, रत्नागिरीचे राजकीय पालकमंत्री व त्यांच्या समर्थकांनी रिफायनरीविरोधकांना सरळ धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यासाठी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा, जिल्हाधिकारी यांना वापरण्यात आले. शशिकांत वारिशे यांच्यावर देखील पोलीस व इतर सरकारी यंत्रणांचा दबाव होता व रिफायनरीविरुद्ध भूमिका घेतली तर परिणाम भोगावे लागतील, असा सावधानतेचा इशारा देण्यात आला. आपल्या आंगणेवाडीतील भाषणाने रिफायनरी समर्थकांतील गुंड प्रवृत्तींना हिरवा झेंडाच मिळाला व वारिशे यांची हत्या झाली, असे आपणास वाटत नाही काय?

‘दर्पण’कार बाळाशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांसारखे ज्वलंत-निर्भीड पत्रकार ज्या कोकणाच्या भूमीत जन्मास आले त्याच भूमीत एका पत्रकाराची हत्या होणे धक्कादायक आहे.

याआधी विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ‘ईडी’, ‘सीबीआय’ व पोलीस यंत्रणेचा वापर होत असे, पण आता विरोधकांच्या हत्याच होऊ लागल्या हे चिंताजनक आहे.

कोकणात याआधी श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर अशा राजकीय हत्या झाल्या व राजकीय दबावामुळे मूळ आरोपी मोकाट राहिले. त्यात खुनी मालिकेत शशिकांत वारिशे यांचे हौतात्म्य जोडले आहे. हे मी आपल्याकडे नमूद करू इच्छितो.

देवेंद्र फडणवीस बदला घेताहेत का? संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले…

वारिशे यांच्या हत्येचा निषेध मुंबई, दिल्लीसह जगभरातील पत्रकार संघटनांनी केला आहे, पण कोकणातील इतर खुनांप्रमाणे हे प्रकरण दडपले जाईल, अशी भीती असल्यानेच या खुनाची समांतर न्यायालयीन चौकशी व्हावी. तसेच शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबियांना किमान 50 लाखांचे अर्थसहाय्य सरकारने करावे, अशी विनंती मी करीत आहे.

शशिकांत वारिशे यांच्या खुनाचे प्रकरण आपण गांभीर्याने घ्यावे. मी स्वत: तसेच शिवसेनेतील माझे प्रमुख सहकारी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी लवकरच रत्नागिरी-राजापूर येथे जात आहोत. याची कृपया नोंद घ्यावी.

दरम्यान, संजय राऊतांच्या या पत्रानंतर वारिशेंच्या हत्या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. ज्याला आता भाजप किंवा देवेंद्र फडणवीस नेमकं कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT