Satara चे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या घरात घुसलं पाणी, मुसळधार पावसाने हाहाकार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा: साताऱ्याचे (Satara) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार श्रीनिवास पाटील (MP Shriniwas Patil) यांच्या कराड (Karad) येथील घरात पावसाचं पाणी घुसल्याचं नुकतंच समोर आलं आहे. यामुळे त्यांच्या घरातील बऱ्याच गोष्टींचं नुकसान झालं आहे. तसंच आजूबाजूच्या परिसरात देखील पाणी शिरल्याने येथील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

काल (मंगळवार, 1 जून) अचानक झालेल्या ढगफुटीमुळे (Heavy rain) कराडसह आजूबाजूच्या परिसरात हाहाकार उडाला. या संपूर्ण भागात अवघ्या काही तासात प्रचंड पाऊस कोसळला. ज्याचा फटका खासदार श्रीनिवास पाटील यांनाही बसला. यामुळे नैसर्गिक ओढ्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मंगळवारी दुपारी अचानकपणे पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास पाऊस धो-धो कोसळत होता. या ढगफुटीमुळे कराडसह मलकापूर परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अनेक दुकान गाळ्यांसह झोपडपट्टी व घरांमध्ये पाणी शिरल्याने कोट्यवधी रुपयांची हानी झाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मलकापूर शहरातील आगाशिवनगर परिसरात अनेक कॉलनी आणि घरात पाणी शिरले. तर पुणे-बंगळूर महामार्गालगत असलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांच्या घरात देखील पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील फर्निचरचे नुकसान झाले आहे. तसेच घराच्या बाजूला असलेल्या शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. फुलझाडे वाहून गेले असून लॉन भिजून नुकसान झाले आहे.

भात लागणीसाठी टाकलेल्या तरवांमध्ये गाळ साचल्याने व ऊस लागवडीसाठी शेतात सोडलेल्या सरीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय खासदार श्रीनिवास पाटील यांच्या कार्यालयातही पाणी घुसल्याने त्याचे नुकसान झाले. सुदैवाने कागदपत्रांची व इतर धनधान्याचे कोणतेही नुकसान झाले नाही.

ADVERTISEMENT

दरम्यान, वारुंजी विमानतळ बाजूकडून येणाऱ्या नैसर्गिक ओढ्यांवरती मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाल्याने नैसर्गिक ओढे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी असणारे ओढे नष्ट होत असल्याने मंगळवारी झालेल्या पावसाने आजूबाजूच्या शेतात प्रवाह निर्माण केला. त्याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसला असून खासदार श्रीनिवास पाटील यांनाही त्याची झळ सोसावी लागली.

ADVERTISEMENT

कोण आहेत खासदार श्रीनिवास पाटील

श्रीनिवास पाटील हे सर्वाधिक चर्चेत आले ते 2019 च्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत. कारण याच पोटनिवडणुकीत त्यांनी साताऱ्यातील दिग्गज नेते उदयनराजे भोसले यांचा प्रचंड मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी विधानसभा निवडणुकीसोबत झालेल्या सातारा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देऊ केली होती. दरम्यान, त्यांच्याच प्रचाराच्या जाहीर सभेत अचानक पावसाने हजेरी लावली होती. त्याच पावसात भिजत शरद पवार यांनी ही सभा देखील घेतली होती. ज्यामुळे येथील राजकीय वातावरण पूर्णपण पालटून गेलं होतं. अखेर निवडणुकीचा निकालात त्याचा परिणाम देखील पाहायला मिळाला. कारण त्यावेळी श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे यांचा दणदणीत पराभव केला होता.

खरं तर श्रीनिवास पाटील हे 1979 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. दरम्यान, निवृत्तीनंतर ते सक्रीय राजकारणात उतरले होते. 1999 ते 2009 पर्यंत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कराड मतदारासंघाचं लोकसभेत नेतृत्व केलं होतं. त्यानंतर 2013 साली त्यांना सिक्कीमचे राज्यपाल म्हणून देखील नियुक्त करण्यात आलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT