अशोक चव्हाणांनी एकनाथ शिंदेंबाबत ‘तो’ गौप्यस्फोट करण्यामागचं टायमिंग का महत्त्वाचं आहे?
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आघाडी सरकारमधील बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं एक वक्तव्य सध्या खूपच चर्चेत आहे. या वक्तव्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांची कोंडी करुन ठेवली आहे. २०१४ मध्ये युती सरकारच्या काळातच शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला आहे. हे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे त्याच्या टायमिंगचीही […]
ADVERTISEMENT

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आघाडी सरकारमधील बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचं एक वक्तव्य सध्या खूपच चर्चेत आहे. या वक्तव्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांची कोंडी करुन ठेवली आहे. २०१४ मध्ये युती सरकारच्या काळातच शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट अशोक चव्हाण यांनी केला आहे. हे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे त्याच्या टायमिंगचीही चर्चा सुरू आहे. राजकारणात टायमिंग महत्त्वाचं असतं. अशोक चव्हाण यांनी हे टायमिंग आत्ताच का साधलं? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
अशोक चव्हाणांनी आत्ताच गौप्यस्फोट का केला?
अशोक चव्हाण यांनी जो गौप्यस्फोट केला आहे त्यात टायमिंग महत्त्वाचं आहे. मुळात अशोक चव्हाण हे असे नेते नाहीत जे गौप्यस्फोट करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अशोक चव्हाण यांचा तो स्वभाव नाही. अशोक चव्हाण तोलूनमापून आणि आपल्यावर काही येऊ नये याचा प्रयत्न करत आस्ते कदम भूमिका घेणारे नेते आहेत. २०१९ ला शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जायचं आहे की नाही? याबाबत मनात असूनही अशोक चव्हाण यांनी उघडपणे भाष्य केलं नव्हतं.
सोनिया गांधींकडे अशोक चव्हाण यांनी काय सांगितलं होतं? ते माहित नाही. मात्र उघडपणे किंवा माध्यमांसमोर अशोक चव्हाण आत्तापर्यंत कधीही उघडपणे काहीही बोलले नव्हते. एकनाथ शिंदे यांनी हेच कारण दिलं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायला नको होतं. या कारणातूनच जो उठाव किंवा बंड झालं आहे. अशात या कारणालाच छेद देण्याची भूमिका कुठेतरी अशोक चव्हाण पार पाडताना दिसत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार काय म्हटलं आहे?
एकनाथ शिंदे हे सातत्याने सांगत आहेत की आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणं पसंत नव्हतं. मी उद्धव ठाकरेंना पाचवेळा सांगितलं होतं की आपण हा प्रयोग नको करायला किंवा यातून बाहेर पडू आणि भाजपसोबत जाऊ. मात्र माझं म्हणणं उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.