मोदी सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरने केली 500 अकाऊंट्स बंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मोदी सरकारच्या इशाऱ्यानंतर ट्विटरने 500 ट्विटर अकाऊंट बंद केली आहेत. एवढंच नाही तर काही हॅशटॅग्जवरही कात्री चालवली आहे. ट्विटरला मोदी सरकारने सुमारे 1178 अकाऊंट बंद करण्यास सांगितली होती. त्यापैकी 500 अकाऊंट बंद करण्यात आली आहेत. नियम मोडल्याप्रकरणी ट्विटरने ही कारवाई केली आहे. या अकाऊंट्सच्या मागे खलिस्तान समर्थक आणि पाकिस्तानचा हात असल्याचं मोदी सरकारने म्हटलं होतं.

मोदी सरकारने ज्या ट्विटर अकाऊंट्सवर बंदी घालण्यास सांगितली होती ती अकाऊंट्स शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली चुकीची माहिती पसरवत असल्याचंही म्हटलं होतं. तसंच या अकाऊंट्समधून काही माथी भडकवणाऱ्या पोस्टही करण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. मोदी सरकारने दिलेल्या आदेशानंतर ट्विटरने एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी बंद केलेल्या 500 अकाऊंट्सची माहितीही दिली आहे.

26 जानेवारी च्या दिवशी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला हिंसाचाराचं वळण लागलं. त्यानंतर नियमांचं उल्लंघन करणारे आणि सामाजिक सलोखा बिघडवणारे अनेक ट्विट्स या अकाऊंट्सवरून करण्यात आले होते. त्यामुळेच केंद्र सरकारने ही अकाऊंट्स बंद करण्यासाठी ट्विटरला आदेश दिला होता. ज्यानंतर ट्विटरने ही कारवाई केली आहे. #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगशी संबंधित सगळे मजूकर हटवण्याचे आदेश केंद्राने ट्विटरला दिले होते. तसंच आदेशाचं पालन केलं नाही तर कारवाईला सामोरं जावं लागेल असाही इशारा दिला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

30 जानेवारीला #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगचा वापर करणाऱ्या सगळ्या अकाऊंट्सवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. ट्विटरने हे आदेश सुरूवातीला ऐकले नाहीत, त्याबद्दल केंद्र सरकारने तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन केले नाहीत तर तुम्हाला दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल असंही ट्विटरला सांगण्यात आलं होतं. यानंतर मात्र या सगळ्याची गंभीर दखल घेत ट्विटरने 500 अकाऊंट्स बंद केली आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT