अमोल खुणे Vs गंगाधर काळकुटे : मनोज जरांगेंवरील कोट्यवधी रुपयांच्या टेंडरच्या आरोपांवर काय म्हणाले?
बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी अमोल खुणे आणि बारस्कर यांना कडक शब्दांत सुनावले आहे. "मी पुढील आठवड्यात स्वतः ED कार्यालयात जाणार आहे, हिंमत असेल तर अटक करा," असे खुले आव्हान काळकुटे यांनी दिले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अमोल खुणे Vs गंगाधर काळकुटे
मनोज जरांगेंवरील कोट्यवधी रुपयांच्या टेंडरच्या आरोपांवर काय म्हणाले?
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी अमोल खुणे आणि बारस्कर यांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत, काळकुटे यांनी पुरावे देण्याचे किंवा अब्रुनुकसानीच्या दाव्याला सामोरे जाण्याचे खुले आव्हान दिले आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आमच्यावर आणि मनोज दादांच्या टीमवर चिखलफेक केली जात असल्याचा संताप व्यक्त करत, आपण स्वतः पुढील आठवड्यात मुंबईतील सक्तवसुली संचालनालय (ED) कार्यालयात जाणार असून, हिंमत असेल तर तिथेच अटक करून दाखवा, अशी आक्रमक भूमिका काळकुटे यांनी घेतली आहे.
अमोल खुणेंचे आरोप काय?
यापूर्वी अमोल खुणे यांनी जरांगे यांच्या टीमवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. अब्दुल सत्तार यांना छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री पद हवे असल्याने, त्यांच्याकडून सहा कोटी रुपयांची सुपारी घेऊन आमदार संजय शिरसाट यांना टार्गेट करण्यात आल्याचा दावा खुणे यांनी केला. तसेच, या पैशांची देवाणघेवाण आणि सर्व व्यवहार ईडीच्या चौकशीत उघड होतील, असा इशाराही त्यांनी दिला. जर आपण चुकीचे असू, तर जरांगे यांची टीम आपल्यावर अब्रुनुकसानीचा दावा का ठोकत नाही? असा सवाल करत, दावा ठोकल्यास त्यांच्याच मागे यंत्रणांचा ससेमिरा लागेल आणि ते उघडे पडतील, अशी भीती खुणे यांनी व्यक्त केली होती.
हे ही वाचा : Personal Finance: घराचा EMI तुमच्या Futureवर किती परिणाम करतो?
जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटे काय म्हणाले?
या आरोपांचा समाचार घेताना गंगाधर काळकुटे यांनी खुणे आणि बारस्कर हे 'ईडी'चे प्रवक्ते आहेत का, असा खोचक सवाल उपस्थित केला. आपण स्वतः येत्या बुधवारी किंवा गुरुवारी ईडीच्या कार्यालयाशी संपर्क साधून रीतसर वेळ घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "तुम्हीच मला कार्यालयात बोलवा, माझी चौकशी करा किंवा मला अटक करा," असे आपण स्वतः ईडीला सांगणार असून, जर या आरोपांमध्ये तथ्य नसेल तर मुंबईहून परतताच खुणे आणि बारस्कर यांच्यावर कायदेशीर मार्गाने अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा थेट इशारा काळकुटे यांनी दिला आहे. खोटे आरोप करणाऱ्यांनी एकतर पुरावे द्यावेत किंवा कोर्टातील लढ्याला सामोरे जावे, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा : ‘गोंधळ’ची अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड, दिग्दर्शकाची मोठी घोषणा!
700 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले का?
याशिवाय, बलांडे पाटील यांना 700 ते 800 कोटींचे कंत्राट मिळाल्याच्या आरोपांवरही काळकुटे यांनी स्पष्टीकरण दिले. बलांडे हे अगोदरपासूनच व्यावसायिक आणि कंत्राटदार असून, त्याचा काहीही संबंध नसल्याचे ते म्हणाले. मनोज दादांना एकटे पाडण्यासाठी आणि मराठा समाजाचा लढा थांबवण्यासाठीच आमच्यावर असे वैयक्तिक आणि बिनबुडाचे आरोप करून ईडीची भीती दाखवली जात आहे. मुंबईला जाण्यापूर्वी आमच्या 84-85 लोकांना उचलण्याचा कटही होता, असा गौप्यस्फोट करत इथून पुढे कोणत्याही खोट्या आरोपांना भीक न घालता जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा काळकुटे यांनी दिला.
