विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने नवीन वर्षात घरच्या मैदानावर इंग्लंडचा ३-१ ने धुव्वा उडवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सुरुवातीला ठरलेल्या वेळापत्रकानुसार इंग्लंडमध्ये Lord’s च्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फायनल मॅच खेळवली जाणार होती. मात्र आता हा सामना १८ जूनपासून साऊदम्पटनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
ICC Player of The Month : रविचंद्रन आश्विन पुरस्काराचा मानकरी
दरम्यान ICC ने अद्याप याबद्दलची माहिती दिलेली नसली तरीही BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी India Today च्या कार्यक्रमात बोलत असताना याबद्दल सांगितलं. “भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचा अंतिम सामना पहायला मी साऊदम्पटनला जाणार आहे. हे आधीच ठरलं होतं…कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि साऊदम्पटनच्या मैदानापासून हॉटेल हे अगदी हाकेच्या अंतरावर आहे. याच कारणासाठी इंग्लंडमध्ये जेव्हा क्रिकेट सुरु करण्यात आलं तेव्हा बऱ्याचश्या मॅचेस याच मैदानावर खेळवण्यात येत आहेत.”
इंग्लंडविरुद्ध चेन्नई टेस्ट मॅच गमावल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेत दमदार पुनरागमन करत इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटला ढकललं होतं. दरम्यान टेस्ट मॅचची सिरीज झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ टी-२० आणि ३ वन-डे सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे.
इंग्लंडवर डावाने पराभवाची नामुष्की, भारत WTC च्या फायनलमध्ये