परळी : बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, त्यानंतर खुनाचा हा प्रकार रेल्वे अपघात असल्याचे भासवण्यासाठी मृतदेह रेल्वे पटरीवर फेकून देण्यात आला. मृतदेह रेल्वे पटरीवर टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परळी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather Update : मान्सूनचा वेग वाढला, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत धडकणार?
आर्थिक व्यवहारातून खून झाल्याची माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, अफजलखान उर्फ तोहीद खैरातीखान पठाण (वय 35, रा. सरदारनगर, परळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेबाबत फिरोजखान खैरातीखान पठाण यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. 31 मे 2026 रोजी लेंडेवाडी शिवारात ही धक्कादायक घटना घडली. आरोपी आणि मृत अफजलखान यांच्यात आर्थिक व्यवहार होता. याच व्यवहाराच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून अफजलखानचा खून केला. त्यानंतर गुन्ह्याचा कोणताही माग लागू नये आणि ही घटना अपघात वाटावी, यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह लेंडेवाडी शिवारातील परळी ते घाटनांदूर रेल्वे पटरीवर नेऊन टाकला.
हेही वाचा : 'त्याने कारमध्येच माझ्यावर...' डेप्युटी कलेक्टरचे कृत्य; 32 वर्षीय महिलेनं काय सांगितलं?
पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरु
या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात ऋषिकेश परमेश्वर फड (रा. वरवटी, ता. अंबाजोगाई, ह.मु. सोमेश्वरनगर, परळी) आणि गौरव दीपक व्यास (रा. स्नेहनगर, परळी) या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), २३८, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, हा अपघात नसून घातपात असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाच्या उलगड्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, आरोपींच्या शोधासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
ADVERTISEMENT











