लाखांदूर : लग्न न लावून दिल्याच्या कारणावरून मुलाने स्वतःच्या वडिलांवर विटेने हल्ला करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यातील आथली गावात घडली आहे. शुक्रवारी (7 नोव्हेंबर) रात्री सुमारे आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मृताचे नाव पुरुषोत्तम कुंभलवार (वय 57) असे असून, आरोपी मुलाचे नाव प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार (वय 33) असे आहे. पोलिसांनी घटनेनंतर काही तासांतच प्रदीपला अटक केली.
ADVERTISEMENT
"तुम्ही आमचे लग्न लावत नाही, अजून किती वाट पाहायची?"
मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम कुंभलवार हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना दोन मुलगे आहेत. ते दोघेही शेतमजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर पुरुषोत्तम, त्यांची पत्नी रेवता (वय 51) आणि धाकटा मुलगा प्रदीप घरात गप्पा मारत बसले होते. मोठा मुलगा प्रेमकुमार (वय 35) त्या वेळी बाहेर गेला होता. या दरम्यान प्रदीपने वडिलांशी लग्नाच्या विषयावरून वाद घातला. “आमचे वय वाढत चालले आहे, तरी तुम्ही आमचे लग्न लावत नाही, अजून किती वाट पाहायची?” असे म्हणत त्याने वडिलांवर आरोप केले. या शाब्दिक वादाचे रुप क्षणात रागात बदलले आणि संतापाच्या भरात प्रदीपने जवळच असलेल्या वीटेने वडिलांच्या डोक्यावर जोरदार वार केला. गंभीर जखमी झालेल्या पुरुषोत्तम यांना तीव्र रक्तस्त्राव होऊन घटनास्थळीच मृत्यू आला.
या घटनेमुळे रेवता कुंभलवार या घाबरून गेल्या आणि त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. रेवता यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मुलगा प्रदीपविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला असून त्याला अटक करण्यात आली आहे. गावात या घटनेने प्रचंड संताप आणि दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. लग्नासारख्या विषयावरून वडिलांच्या जीवावर बेतलेला वाद हा समाजाला हादरवून सोडणारा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, प्रदीपला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











