Delhi Car Blast : दिल्लीत मंगळवारी (दि.11) झालेल्या कार ब्लास्टमुळे संपूर्ण देश हादरलाय. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. हा दहशतवाद्यांनी रचलेला कट असून या प्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास सुरु केलाय. दरम्यान, या भीषण घटनेत उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील रहिवासी अशोक कुमार (वय 34) यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. दिल्लीमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करणारे अशोक दररोजप्रमाणे ड्युटी संपवून घरी परतत होते. पण त्या दिवशी नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्या स्फोटाने सर्व काही संपवलं.
ADVERTISEMENT
वृद्ध आईला मुलाची बातमी सांगण्याची कोणाची हिंमत होईना
अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मंगरौला गावात अशोक यांचं घर आहे. वडिलांचं निधन आधीच झालेलं असून आता वृद्ध आई आणि संपूर्ण कुटुंबाचा एकमेव आधार अशोकच होते. त्यांच्या जाण्याने गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे. परंतु आईला अद्याप मुलाच्या मृत्यूची बातमी सांगण्यात आलेली नाही. कुटुंबियांचा सांगण्याप्रमाणे, आईची तब्येत नाजूक असल्याने काही काळ सत्य दडवून ठेवण्यात आलं आहे.
अशोक यांच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुलं आहेत. दोन मुली आणि एक मुलगा. ते दिल्लीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते आणि संपूर्ण घरखर्च त्यांच्या नोकरीवरच अवलंबून होता. त्यांचे नातेवाईक म्हणाले, “ते आमचे मेहुणे होते. फार मेहनती माणूस होता. रोज ड्युटी संपवून कुटुंबासाठी काही ना काही घेऊन घरी यायचा. असा अंत होईल, याची कल्पनाही नव्हती.”
हेही वाचा : वडील हयात नाहीत, आईला कॅन्सर; धंद्यासाठी कपड्यांची खरेदी करायला गेला अन् दिल्ली ब्लास्टमध्ये...
संपूर्ण गावावर शोककळा
अशोक यांचे चुलत भाऊ सोमपाल शर्मा यांनी सांगितले की, “टीव्हीवर बातमी पाहिल्यानंतरच पोलीस गावात आले आणि चौकशी केली. आम्हाला टीव्हीवरून कळलं की दिल्ली ब्लास्टमध्ये अमरोहातील एक व्यक्ती मरण पावली आहे. काही वेळाने पोलिसांनी नावाची पुष्टी केली. इतकी मोठी चूक कशी होऊ शकते, हे आम्हाला कळत नाही. सरकारने पीडित कुटुंबाला योग्य तो मोबदला द्यावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी कुटुंबाने केली आहे. गावातील लोक सांगतात की, अशोकसारखा साधा आणि प्रामाणिक माणूस दहशतवाद्यांच्या कटाचा बळी ठरला.
दिल्ली स्फोटाच्या तपासात काश्मीरपासून फरीदाबाद आणि लखनऊपर्यंतचे धागे जुळू लागले आहेत. मृतांची ओळख जाहीर झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी माहिती अमरोहा पोलिसांपर्यंत पोहोचवली. स्थानिक पोलीस टीम मंगरौला गावात पोहोचली आणि कुटुंबियांकडून अशोक यांच्या दिल्लीतील वास्तव्य, नोकरी आणि मित्रमंडळींबद्दल चौकशी केली. पोलिस तपासत आहेत की, स्फोटाच्या दिवशी अशोक कोणत्या मार्गावर होते? आणि ते त्या ठिकाणी कसे पोहोचले. सध्या कुटुंबीयांना दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांनी सांगितलं की, मृत्यूची खात्री झाल्यानंतर अशोक यांची पत्नी आणि भाऊ दिल्लीकडे रवाना झाले आहेत. दिल्लीमध्ये पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह गावात आणण्याची तयारी सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
विधानसभेच्या अध्यक्षपदाची संधी दिली, 40 वर्षांपासून सहकारी; पण तोच मातब्बर नेता शरद पवारांची साथ सोडणार
ADVERTISEMENT











