‘लढेगा साला… मरेगा नहीं’, जितेंद्र आव्हाडांचा पोलिसांना गर्भित इशारा

भागवत हिरेकर

09 Apr 2023 (अपडेटेड: 09 Apr 2023, 01:02 PM)

जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करत ठाणे पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी आवरावं, असा इशारा आव्हाडांनी दिला आहे.

NCP Mla jitendra awhad warns to thane police, said his tweet that police should behave responsibly

NCP Mla jitendra awhad warns to thane police, said his tweet that police should behave responsibly

follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा ठाण्यातील पोलिसांना लक्ष्य करत संताप व्यक्त केला. अलिकडेच घडलेल्या रोशनी शिंदे प्रकरणापासून गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाडांनी आव्हान दिलं आहे.

हे वाचलं का?

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. ज्यात आव्हाड म्हणतात, “ठाणे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तंग करण्यासाठी वापरण्यात येतं आहे. नवी मुंबईत अनु आंग्रे तर ठाण्यात विक्रम खामकर, हेमंत वाणी, अभिजीत पवार, विशांत गायकवाड या सगळ्यांना तडीपार करण्याच्या कारवाईला देखिल सुरुवात झाली आहे. मला देखिल येन-केन प्रकारे गुंतवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तुम्हांला 10-15 वर्षे शिक्षा होईल. तुम्ही कशाला स्वतःचा जीव अडचणीत आणताय. तुम्ही जितेंद्र आव्हाड यांचे नाव सांगून टाका. सर्व साक्षीदारांना ज्यांनी 3 वर्षापूर्वीच साक्ष दिली आहे.ज्यांची चार्जशीट देखिल कोर्टात गेलेली आहे त्या सर्व आरोपीना जे 3 वर्षांपूर्वीचा आरोपी झालेले आहेत आणि ज्यांची चार्जशीट देखिल कोर्टात गेलेली आहे. त्यांना घाबरवण्याचे पूर्ण प्रयत्न आहेत.”

कायद्यालाही जुमानत नाहीत, आव्हाडांचा गंभीर आरोप

जितेंद्र आव्हाडांनी असंही म्हटलंय की, “ते काय साध्य करू इच्छित आहेत हे देवास ठाऊक. तुम्हांला फाशी होईल. 10-15 वर्षे जेल होईल. हे कुठल्या कायद्यान्वये होईल हे त्यांचं त्यांनाच माहीत. पण सुप्रीम कोर्टाने फेर तपासाची मागणी नाकारली आणि पुढील तपासाचे आदेश दिले. पुढील तपास म्हणजे तुमच्या हातात नवीन काही लागले आहे का? त्याच्यावर तपास करा आणि त्या संबंधित लोकांवर तपास करा. तुम्ही सगळ्यांनाच बोलावून तपास करण हे कायद्याला धरून नाही. पण ठाणे पोलीस कायद्याला अजिबात जुमानत नाहीत.”

हेही वाचा >> फासावर लटकवणार का? जितेंद्र आव्हाडांच्या संतापाचा कडेलोट, तरुणाईला हाक

“आनंद परांजपे यांच्यावर देखील अनेक केसेस टाकण्यात आल्या. तसेच ठाकरे गटाची कार्यकर्ती रोशनी शिंदे प्रकरण अगदीच किळसवाणे होते. तिला माता होण्यापासून रोखण्यापर्यंत मजल गेली. पण पोलीस मात्र कारवाई करायची हिम्मतच दाखवत नाहीत. उलट तिच्यावरच गुन्हा दाखल झाला. तसेच ठाकरे गटाची स्मिता आंग्रे या कार्यकर्तीला देखिल दम दिला आणि तिच्या तक्रारीची दखल सुद्धा घेतली नाही. स्वप्नील कोळी ह्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कोळीवाड्यात जाऊन मारहाण केली”, असं म्हणत आव्हाडांनी ठाणे पोलिसांवर निशाणा साधला आहे.

“दिवास्वप्न बघू नका, पोलिसांनी स्वतःला आवरावं”, आव्हाड काय म्हणाले?

“गेले 6 महिने महापालिका प्रशासनाचा वापर करून अनधिकृत बांधकामाचे तो थोर सहाय्यक आयुक्त यांचा वापर करून अनेकांना गुडघ्यावर बसवण्याचे काम केले. अनेकांवर केसेस दाखल केल्या. कित्येकांवर गोळीबार झाले. परंतु केसेस घ्यायला कोणीही तयार नाही. कित्येकांवर खोट्या केसेस झाल्या. कोणी बोलायला तयार नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“अशा ह्या परिस्थितीत पोलीस प्रशासन असो नाहीतर महापालिका प्रशासन असो यांचा पूर्णपणे वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना संपवण्याच्या उद्देशाने त्यांना वापरलं जातं आहे. पण हे दिवास्वप्न बघू नका पोलिसांनी स्वतःला थोडा आवर घालावा. अन्यथा स्फोटक परिस्थिती तयार होईल. मला एकच माहिती आहे ‘लढेगा साला…मरेगा नहीं”, असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांना दिला आहे.

    follow whatsapp