Sangli Crime, स्वाती चिखलीकर : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ चोरीच्या संशयावरून दोन निष्पाप मुलींना रात्रभर उलटे टांगून त्यांचा अमानुष छळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर दहा वर्षीय सानिकाचा मृत्यू झाला असून तिची 11 वर्षीय बहीण अनुजा देखील गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ADVERTISEMENT
हात-पाय बांधून पत्र्याच्या अँगलला उलटे टांगले
याबाबत अधिक माहिती अशी की, बनपुरी येथील मुलींवर शेजाऱ्यांनी चोरीचा संशय घेतल्याने नाना हैबत यमगर या निर्दयी बापाने काल बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास सानिका आणि अनुजा या दोन्ही मुलींना हात-पाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटे टांगले. यानंतर या निष्पाप मुली वेदनेने रात्रभर तडफडत 'पाणी, पाणी' म्हणून ओरडत राहिल्या. मात्र, आई-वडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही. तर मुलींना टांगणारे निष्ठुर आई-वडील निर्धास्तपणे झोपी गेले.
हे ही वाचा : फक्त 'त्या' एका गोष्टीसाठी 21 देशांचा प्रवास अन्... भोंदूबाबा अशोक खरातचा हादरवून टाकणारा नवा कारनामा
गुपचूप उरकला अंत्यसंस्कार
यानंतर आज गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुलीच्या आजोबांनी मुलींना खाली सोडवले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सानिका ही मृतावस्थेत आढळली, तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती. यांनतर अनुजाला जखमी अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मृत सानिकाला दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र सानिका मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, ही घटना बाहेर येऊ नये म्हणून संबंधित कुटुंबीयांनी मयत सानिकेचा अंत्यसंस्कार गुपचूप करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
हे ही वाचा : Petrol Pump Rules: एका दिवसात 'एवढं' पेट्रोल-डिझेल करू शकता खरेदी.. नेमका नियम काय?
'असा' उघडकीस आला प्रकार
मात्र, जखमी अनुजाने शुद्धीवर आल्यानंतर आम्हाला वडिलांनी हात-पाय बांधून टांगले आणि मारहाण केली असे सांगितल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या संपूर्ण प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली असून सध्या पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. घटनेनंतर आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलींना सोडणाऱ्या आजोबांवरच मुलीच्या वडिलांनी कोयत्याने हल्ला करत त्यांना धमकावले होते. यामुळे कुटुंबातील अंतर्गत वाद आणि क्रौर्याची परिसीमा स्पष्ट होत आहे. ही घटना केवळ एक गुन्हा नसून माणुसकीचा झालेला क्रूर खून असल्याची भावना व्यक्त होत आहे. दोन निष्पाप जीवांवर एवढा अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
ADVERTISEMENT











