Monsoon Update: मुंबईसह अनेक जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' पण नेमका कशाचा?

मान्सूनची आगेकूच मंदावली असून महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेचा तडाखा बसणार आहे. त्यामुळे जून महिन्यात देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट देण्यात आला आहे.

monsoon update yellow alert for mumbai and several other districts but exactly for what imd 11 june 2026 weather

Monsoon Update (प्रातिनिधक फोटो)

मुंबई तक

• 10:06 PM • 11 Jun 2026

follow google news

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची वाटचाल मंदावल्याचे चित्र दिसत असतानाच आता बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला पुन्हा गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र महाराष्ट्रासाठी अद्यापही फारसे पोषक वातावरण तयार झालेले नसल्याने राज्यातील अनेक भागांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते.

हे वाचलं का?

बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे मान्सूनला मिळणार चालना

हवामानातील घडामोडींनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामान तज्ज्ञांचे मत होते की, उपसागरात कोणतीही प्रभावी प्रणाली निर्माण झाल्याशिवाय मान्सून पुढे सरकणार नाही. आता ही प्रणाली तयार होत असल्याने मान्सूनच्या पुढील प्रवासाला मदत होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Weather : राज्यात धो धो पाऊस कोसळणार, 'या' 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट

दुसरीकडे, अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत होते. मात्र सध्या राज्याच्या किनारपट्टी भागात ढगांची विशेष गर्दी किंवा कमी दाबाचे क्षेत्र दिसून येत नसल्याने महाराष्ट्रातील मान्सूनची प्रगती काहीशी संथ झाली आहे.

महाराष्ट्रात मान्सूनची आगेकूच ठप्प

महाराष्ट्रात मान्सूनने दक्षिणेकडील काही भाग व्यापले असले तरी गेल्या दोन ते तीन दिवसांत त्याने विशेष प्रगती केलेली नाही. मुंबईसह मध्य महाराष्ट्रात मान्सून 10 ते 12 जूनदरम्यान पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात त्याची वाटचाल मंदावल्याने आता मुंबईसह राज्याच्या इतर भागांमध्ये मान्सून 15 ते 16 जूनच्या सुमारास दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा>> Monsoon Update: महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट.. वादळी वारे अन् मुसळधार पाऊस!

दरम्यान, ईशान्य भारतातील बहुतांश भाग आणि दक्षिण भारतातील काही राज्ये मान्सूनने व्यापली आहेत. मात्र उत्तर भारतात अद्याप मान्सूनची लक्षणीय प्रगती झालेली नाही.

ओडिशा, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या प्रणालीचा सर्वाधिक परिणाम ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांवर होण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तर पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये धुळीच्या वादळांचा (डस्ट स्टॉर्म) प्रभाव दिसून येऊ शकतो. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रासाठी पुढील तीन दिवसांचा अंदाज

गुरुवार : उष्णतेचा इशारा

मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, अहिल्यानगर तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

शुक्रवार : उष्णता कायम, तुरळक पावसाची शक्यता

शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम राहणार आहे. राज्यातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र हा पाऊस सर्वत्र होईलच असे नाही. काही जिल्ह्यांत किंवा काही गावांमध्येच पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

शनिवार : काही भागांत पावसाचा अंदाज

शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा इशारा कायम राहणार आहे. तर विदर्भातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर परिसरात वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

हवामान विभागाने मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसच्या आसपास असले तरी उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकंदरीत, बंगालच्या उपसागरातील नव्या प्रणालीमुळे मान्सूनला गती मिळण्याची चिन्हे असली तरी महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. पुढील काही दिवस राज्यातील बहुतांश भागांना उष्णतेचा सामना करावा लागणार असून, काही ठिकाणीच तुरळक पावसाच्या सरींची शक्यता आहे.