नाशिक : नाशिक जिल्हा एका भीषण कार अपघाताने हादरला. नाशिक-कळवण रस्त्यालगत कोल्हापूर फाट्याजवळ बुधवारी (4 जून)ला रात्री 10 वाजता हा भीषण कार अपघात झाला. अपघातात नामपूर आणि देवळा येथील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नातेवाईकाच्या लग्न समारंभातून सटाण्याकडे परतत असलेल्या भदाण कुटुंबीयांवर काळाने घाला घातला.
ADVERTISEMENT
रस्ता सोडला अन् बंगल्यावर जाऊन धडकली कार
नामपूर येथील भदाण कुटुंबीय नाशिकमधील लग्न समारंभ आटोपून कारने (MH 41 BE 5443) परतत होते. चालक खालिक मेहमूद पठाण यांचा गाडीवरील ताबा सुटल्यानं कार थेट विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल्यावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की बंगल्याबाहेरील सिमेंटचा खांबही वाकला. या अपतात गाडीतले पाचही जण ठार झालेत.
हे ही वाचा >> भर चौकात कोयते निघाले, दगड भिरकावले... बीडमध्ये गुन्हेगारांचा हैदोस सुरूच, नवा व्हिडीओ समोर
कारमधील 5 जणांचा जागीच मृत्यू
या अपघातात शैला वसंत भदाण (62), सरला भालचंद्र भदाण (50), चालक खालिक मेहमूद पठाण (50), माधवी मेतकर (32) आणि त्यांची मुलगी त्रिवेणी मेतकर (04) यांचा जागीच मृत्यू झाला. भालचंद्र भदाण (52) आणि उत्कर्ष मेतकर (12) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा >> पत्नीला संपवलं, मग भावाला फोन केला आणि स्वत:ला संपवलं... जळगावमधील धक्कादायक घटना
मृतांमध्ये शैला भदाण आणि माधवी मेतकर या मायलेकी असून, त्रिवेणी ही माधवी यांची मुलगी आहे. या दुर्घटनेमुळे भदाण आणि मेतकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. वैद्यकीय पथक जखमींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
