Solapur Crime ,सोलापूर : माळशिरस तालुक्यातील वाफेगाव परिसरात उसाच्या शेताशेजारील मोकळ्या जागेत सापडलेल्या महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय देत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. चुलत भावासोबतचे अनैतिक संबंध थांबवल्यानंतर निर्माण झालेल्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे न्यायालयाने निष्पन्न केले.
ADVERTISEMENT
घटनेत नेमकं काय घडलं होतं?
फिर्यादी मोहन शंकर बनसोडे यांच्या पत्नीचे आरोपी शंकर सरवदे या चुलत भावाशी काही काळ अनैतिक संबंध होते. मात्र, हत्येच्या साधारण महिनाभर आधी महिलेने हे संबंध पूर्णतः तोडले. त्यानंतर आरोपी सतत तिला भेटून पुन्हा नातेसंबंध ठेवण्याचा दबाव टाकू लागला. तिने नकार दिल्यास जीव घेण्याची धमकीही दिल्याचे तपासात पुढे आले. घटनेच्या दिवशी मोहन बनसोडे कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना आरोपी शंकर सरवदे महिलेची भेट घेतली होती. त्यानंतर तिला शेतात नेऊन प्रथम तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर गळा आवळून निर्दयीपणे जीव घेतला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सोडून, कपडे दूर नेऊन फेकल्याचे समोर आले.
हेही वाचा : बार्शी : गरोदर महिलेला पोलिसांकडून शरीर काळं-निळं पडेपर्यंत मारहाण, मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल
घटनेची तक्रार अकलूज पोलीस स्टेशनमध्ये दाखल होताच तपासाला गती मिळाली. आरोपीने स्वतःच पंचनाम्यादरम्यान घटनास्थळ दाखवून दिल्यामुळे तपास अधिक मजबूत झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेले महिलेचे आणि आरोपीचे कपडे फॉरेन्सिक टीमकडे पाठवले. तपास अहवालात आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळल्याने त्याच्याविरुद्धचा पुरावा अधिक बळकट झाला. या प्रकरणात एकूण 15 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यात फिर्यादीची आई, प्रत्यक्षदर्शी तसेच तपास अधिकारी यांच्या जबाबांनी आरोपीची भूमिका अधिक स्पष्ट झाली. संपूर्ण खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एल. डी. हुली यांच्या न्यायालयात पार पडली.
न्यायालयाने काय निकाल दिला?
सर्व पुरावे, साक्षी आणि तांत्रिक तपास अहवालांचा बारकाईने अभ्यास करून न्यायालयाने आरोपी शंकर सरवदे याला दोषी ठरवले. भा.दं.वि. कलम 302 अन्वये त्याला आजीवन कारावास आणि 2,000 रुपयांचा दंड (दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास) अशी शिक्षा सुनावण्यात आली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यासाठी भा.दं.वि. कलम 201 अंतर्गत 3 वर्षे सश्रम कारावास आणि 1,000 रुपयांचा दंड (दंड न भरल्यास एक महिना तुरुंगवास) अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात शासनतर्फे ऍड. संग्राम पाटील, ऍड. एस. ए. ढवळे आणि ऍड. एस. टी. मेवेगिरी यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीचा हेतू आणि गुन्हा स्पष्ट केला. फिर्यादी मोहन बनसोडे यांच्या वतीने ऍड. जी. पी. कदम यांनी न्यायालयास साहाय्य केले. या संपूर्ण प्रकरणाने स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. अखेर न्यायालयाच्या निर्णयाने पीडितेच्या कुटुंबाला अंशतः दिलासा मिळाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











