Crime News : पती-पत्नीमध्ये सुरुवातीला झालेली बाचाबाची नंतर रक्तरंजित हत्याकांडात बदललेली पाहायला मिळालीये. बंटी नावाच्या व्यक्तीने किरकोळ वादातून आपली पत्नी रिटाबेन सोलंकी हिची चाकूने वार करून हत्या केली. गंभीर जखमी झालेल्या रिटाबेनचा अतिरक्तस्रावामुळे जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
ADVERTISEMENT
धक्कादायक बाब म्हणजे, बंटी आपल्या पत्नीवर सतत संशय घेत असे आणि तिच्यावर नजर ठेवण्यासाठी त्याने चक्क घरात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले होते. तरीही त्याचा संशय कमी झाला नाही आणि या विकृत संशयाने अखेर एका सुखी संसाराचा अंत केला. पोलिसांनी वेगाने हालचाली करत फरार झालेल्या आरोपी पतीला काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.
एका संशयाने उद्ध्वस्त झाले कुटुंब; दोन निष्पाप मुले पोरकी
या भीषण हत्याकांडामुळे केवळ एका महिलेचा बळी गेला नाही, तर दोन निष्पाप मुलांच्या डोक्यावरचे आईचे छत्र कायमचे हरवले आहे. मृत रिटाबेनला 13 वर्षांचा आणि अवघ्या अडीच वर्षांचा असे दोन मुलगे असून, त्यांच्या समोर आता अंधकारमय भविष्य उभे राहिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती बंटी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात नेहमीच वाद होत असत. हा वाद इतका टोकाला गेला की, त्याने थेट तिची जीवनयात्राच संपवली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, घटनास्थळावरून पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. एकीकडे आरोपी पती पोलीस कोठडीत आहे, तर दुसरीकडे आईच्या मृत्यूने आणि वडिलांच्या कृत्याने दोन्ही मुले उघड्यावर पडली आहेत. वडोदरा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, हत्येमागे संशयाव्यतिरिक्त इतर काही कारणे आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे. रागाच्या भरात आणि संशयापोटी घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची हळहळ संपूर्ण शहरात व्यक्त होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











