Crime News : उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक तरुण गेल्या पाच महिन्यांपासून आपल्या पत्नीला परत मिळवण्यासाठी वणवण भटकत आहे. पीडित पतीचा आरोप आहे की, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एका तरुणाने आपल्या साथीदारांसह त्याच्या पत्नीचे अपहरण केले आहे. याप्रकरणी पीडिताने आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'जीजूंनी माझ्या स्वप्नात येऊन छेड काढली..', मेहुणीने तुरुंगात पाठवलं, सात वर्षांनी जबाब बदलला!
इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख आणि अपहरण
मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या या तरुणाने सांगितले की, त्याच्या पत्नीची फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून लखनऊ येथील रहिवासी रणजित पाल याच्याशी मैत्री झाली होती. आरोप आहे की, 20 ऑक्टोबर 2025 रोजी रणजितने आपल्या एका साथीदारासह मिळून त्याच्या पत्नीचे अपहरण केले. इतकेच नव्हे तर आरोपीने घरात ठेवलेले 60 हजार रुपये रोख, दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी आणि चांदीचे दागिनेही लंपास केले आहेत.
पतीला जीवे मारण्याची धमकी
या घटनेचा उलगडा पतीच्या सहा वर्षांच्या मुलीने केला, जिने आपल्या आईला दोन अनोळखी व्यक्तींसोबत जाताना पाहिले होते. पीडित पतीचा दावा आहे की, रणजितने त्याच्या पत्नीला बंधक बनवून ठेवले असून तो तिला ब्लॅकमेल करत आहे. पतीने अनेकदा आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपी पत्नीला सोडण्यास तयार नाही. उलट, आरोपीने पीडित पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
सोशल मीडियावर मैत्री करताना दक्षता बाळगा
पाच महिने उलटूनही पत्नीचा कोणताही पत्ता न लागल्याने हताश झालेल्या पतीने अखेर पोलिसांकडे दाद मागितली आहे. पोलिसांनी याप्रकरणी रीतसर गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली आहेत. सोशल मीडियावरील मैत्री कशी जीवावर बेतू शकते, याचे हे एक गंभीर उदाहरण समोर आले असून पोलीस आता तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा आणि बेपत्ता महिलेचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT











