लग्नाला काही तासच शिल्लक होते, फुलांनी सजलेल्या गाडीतच नवरदेवाला संपवले, कोणी केली हत्या?

फुलांनी सजवलेल्या कारमधून नवरदेव आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी निघाला होता. मात्र, घरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरच त्याच्या या प्रवासाला खीळ बसली.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 01:10 PM • 03 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

फुलांनी सजलेल्या गाडीतच नवरदेवाला संपवले

point

नवरीच्या मोबाईलमध्ये काय सापडलं?

Crime News : लग्नाच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण होते, ढोल-ताशांच्या गजरात नातेवाईक थिरकत होते आणि फुलांनी सजवलेल्या कारमधून आझाद नावाचा नवरदेव आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी निघाला होता. मात्र, घरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर नॅशनल हायवेवर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी या नव्या प्रवासाला खीळ घातली.

हे वाचलं का?

दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी कारवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये एक गोळी आझादच्या छातीत तर दुसरी जबड्यात लागली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आझादला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून लग्नघरावर दु:खाचे सावट पसरले आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर परिसरातील ही घटना आहे.

नवरीची चौकशी 

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आझाद बिंद याचे लग्न बीबीपुर येथील एका तरुणीशी ठरले होते. मात्र, या लग्नावर नवरीचा नातेवाईक प्रदीप प्रचंड नाराज होता. प्रदीपने दोन दिवसांपूर्वीच आझादला लग्न न करण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी संशयावरून नवरीची चौकशी केली आणि तिचा मोबाईल तपासला असता, प्रदीपनेच आपल्या साथीदारांच्या मदतीने हा कट रचल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, आरोपी प्रदीप हा सराईत गुन्हेगार असून जानेवारी 2025 मध्ये एका हत्येच्या प्रकरणात तो जामिनावर बाहेर होता.

हे ही वाचा : पुणे : 3 वर्षीय चिमुरड्याची बलात्कार करुन निर्घृण हत्या, बॅगेत लपवला मृतदेह; अल्पवयीन आरोपीला अटक

'असा' रचला कट

या हत्याकांडाचा कट अत्यंत नियोजनबद्ध रितीने रचण्यात आला होता. मुख्य आरोपी प्रदीप आणि त्याचा साथीदार रवी यादव हे वरात निघाल्यापासून तिसरा आरोपी भोला राजभर याच्याकडून सातत्याने नवरदेवाच्या कारचे लोकेशन घेत होते. कार हायवेवर पोहोचताच संधी साधून त्यांनी गोळ्या झाडल्या आणि अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. शनिवारी दोन डॉक्टरांच्या पथकाने आझादच्या मृतदेहाचे पोस्ट मार्टम केले, ज्याची व्हिडिओग्राफीही करण्यात आली. या अहवालात आझादला दोन गोळ्या लागल्याची पुष्टी झाली आहे. त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे ही वाचा : पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर घरात घुसून ब्लेडने सपासप वार; रक्ताच्या थारोळ्यात तडफडू लागली...

फरार आरोपींवर 25 हजारांचे बक्षीस

जौनपुरचे पोलीस अधीक्षक कुंवर सिंह यांनी सांगितले की, नवरीच्या नातेवाईकाने लग्नाला विरोध असल्याने ही हत्या केली आहे. याप्रकरणी प्रदीप बिंद, रवी यादव आणि भोला राजभर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपी प्रदीप आणि रवी यांच्यावर प्रत्येकी 25-25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पोलिसांची अनेक पथके आरोपींच्या शोधात ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. ज्या घरात सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते, तिथे आता केवळ आक्रोश आणि शांतता पसरली असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट आहे.