अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात अग्नीतांडव ! ICU ला लागलेल्या आगीत ११ रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रातील रुग्णालयांत अग्नीतांडवाची आणखी भीषण घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात ICU ला लागलेल्या भीषण आगीत ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शॉट सर्कीटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली असली तरीही याबद्दल अद्याप अधिकृत कोणतही स्पष्टीकरण आलेलं नाही. आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते, या सर्व रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ११ […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:53 AM • 06 Nov 2021

follow google news

महाराष्ट्रातील रुग्णालयांत अग्नीतांडवाची आणखी भीषण घटना समोर आली आहे. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात ICU ला लागलेल्या भीषण आगीत ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शॉट सर्कीटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली असली तरीही याबद्दल अद्याप अधिकृत कोणतही स्पष्टीकरण आलेलं नाही.

हे वाचलं का?

आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते, या सर्व रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ११ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. दरम्यान या अपघाताची सखोल चौकशी होणार असून आगीचं कारणंही तपासलं जाईल. याचसोबत मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत केली जाईल असंही आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे.

बचावकार्यादरम्यान या रुग्णालयातले एसी बंद करण्यात आले होते. त्यामुळे ११ रुग्णांचा मृत्यू हा श्वास कोंडून झाला की आगीत होरपळून झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. आगीचं कारणं आणि रुग्णांच्या मृत्यूबाबत चौकश केली जाणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही आपण घटनास्थळी भेट देणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “मी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून मी काही दिवसांपूर्वीच सूचना दिल्या होती. जे कोणी या घटनेमध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. तसंच मृतांच्या परिवाराला मदत देण्यात येणार आहे”.

दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील एका रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये काही निष्पाप बालकांना आपला जीव गमवावा लागला होता.

    follow whatsapp