‘माणसानं एवढं दुटप्पी वागू नये’, काकांवरच्या टीकेने अजित पवार संतापले.. राज ठाकरेंना सुनावलं!

मुंबई तक

02 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:36 AM)

Ajit Pawar: बारामती: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुरुवारी (2 डिसेंबर) कुडाळमधील पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जहरी टीका केली होती. राष्ट्रवादीमुळेच शिवाजी महाराजांबाबत (Shivaji Maharaj) राजकारण सुरु झालं असा थेट आरोप राज ठाकरेंनी केला. ज्याला आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चोख प्रत्युत्तर […]

Mumbaitak
follow google news

Ajit Pawar: बारामती: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुरुवारी (2 डिसेंबर) कुडाळमधील पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जहरी टीका केली होती. राष्ट्रवादीमुळेच शिवाजी महाराजांबाबत (Shivaji Maharaj) राजकारण सुरु झालं असा थेट आरोप राज ठाकरेंनी केला. ज्याला आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ते बारामतीत बोलत होते. (ajit pawar responded to raj thackerays criticism of sharad pawar ncp vs mns)

हे वाचलं का?

‘राज ठाकरेंच्या आरोपात नखभरही तथ्य नाही’

‘राज ठाकरेंचा आरोप हा धादांत खोटा आणि बिनबुडाचा आहे. त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला माहिती आहे की, पवार साहेबांचं नाव घेतलं की ती बातमी होते. पण राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे योग्य वाटत नाही. राज साहेब ज्यावेळेस पवार साहेबांची मुलाखत घेत होते तेव्हा साहेबांच्याबद्दल काय बोलत होते. म्हणजे इतकं दुटप्पी माणसाने वागू नये.’

‘पवार साहेबांना उभा महाराष्ट्र 55 वर्ष ओळखतोय. नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार हाच डोळ्यासमोर ठेवला आणि तशाच पद्धतीने सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम केलं. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे खरं तर हास्यास्पद बाब आहे. त्यांच्या आरोपात नखभर देखील तथ्य नाही.’ असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरेंनी शरद पवारांवर नेमका काय आरोप केलेला?

‘हे खरं राष्ट्रवादी काँग्रेसपासून सगळं सुरु झालं. बरं का.. जे शरद पवार कधीही सुरुवातीपासून शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे नाहीत.. काढून बघा त्यांची भाषणं. व्यासपीठावर शाहू-फुले-आंबेडकर. मी त्यांची मुलाखत घेतलेली तेव्हा पण विचारलेलं. त्यात त्यांनी असं म्हटलेलं की, शाहू-फुले-आंबेडकर हा एक विचार आहे. मग शिवाजी महाराज काय विचार नव्हता?’

‘शिवरायांचं नाव घेतलं की, मुस्लिम मतं जातात. मग कोणत्या तरी टोळ्या उभ्या करायच्या फंडिंग द्यायला, मग त्यांच्याकडून शिवरायांचं राजकारण करायचं. म्हणजे हे इतर समाज आणि मराठा समाज यांच्यात जशी फूट पाडता येईल तेवढा फक्त प्रयत्न करायचा. तेव्हापासून हे सगळं सुरु झालं. महाराष्ट्रात हे विष कालवलं गेलं ते 1999 पासून.’ असा आरोप राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला होता.

अजितदादा राज्यपाल कोश्यारींवरही संतापले

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याबाबत देखील आपला संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सध्या महाराष्ट्रात त्यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे. तशीच नाराजी अजित पवारांनी देखील जाहीर केली आहे.

‘महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची भावना अतिशय तीव्र आहे. शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं कोणी उठसूट वक्तव्य करणं हे महाराष्ट्रातील जनता कदापि खपवून घेणार नाही. त्यामुळे राज्यपालांना ज्यांनी नेमलं आहे त्या वरिष्ठांनी ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालावं आणि त्यासंदर्भात तात्काळ कारवाई केली पाहिजे.’ अशी मागणीच यावेळी अजित पवारांनी केली आहे.

आता राज ठाकरे अजित पवारांच्या या टीकेचं नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp