रामायणातील रावण काळाच्या पडद्याआड! अरविंद त्रिवेदी यांचं मुंबईत निधन

मुंबई तक

• 02:49 AM • 06 Oct 2021

भारतात टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार अरविंद त्रिवेदी यांचं ह्रदयविकाराने निधन झालं. मंगळवारी (5 ऑक्टोबर) मध्यरात्री मुंबईत त्यांची प्राणज्योत मालवली. ते 83 वर्षांचे होते. अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये झाला होता. गुजराती रंगमंचावरून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरूवात केली. रामायण मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अरविंद त्रिवेदी […]

Mumbaitak
follow google news

भारतात टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार अरविंद त्रिवेदी यांचं ह्रदयविकाराने निधन झालं. मंगळवारी (5 ऑक्टोबर) मध्यरात्री मुंबईत त्यांची प्राणज्योत मालवली. ते 83 वर्षांचे होते.

हे वाचलं का?

अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये झाला होता. गुजराती रंगमंचावरून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरूवात केली. रामायण मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अरविंद त्रिवेदी यांनी 300 हून अधिक हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत.

गुजरातीतील धार्मिक आणि सामाजिक सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतः ओळख निर्माण केली. गुजरातीमध्ये त्यांनी जवळपास 4 दशक काम केलं. अरविंद त्रिवेदी यांना त्यांच्या अभिनयासाठी गुजरात सरकारने सात वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे.

2002 मध्ये त्यांना सेन्सॉर बोर्डाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांनी 20 जुलै 2002 ते 16 ऑक्टोबर 2003 या कालावधीत सेन्सॉर बोर्डावर काम केलं. 1991 मध्ये अरविंद त्रिवेदी यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. त्यानंतर साबरकथा मतदारसंघातून ते खासदार झाले होते. 1996 पर्यंत ते या मतदारसंघाचे खासदार होते.

रामायण मालिकेतील त्यांचे सहकलाकार आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनी अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. खुपच वाईट बातमी आहे. आमचे प्रिय अरविंद भैय्या आता आपल्यात राहिले नाहीत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. मी निःशब्द झालोय. माझ्यासाठी वडिलांप्रमाणे असणारे, माझा मार्गदर्शक आणि हिंतचिंतक गमावला आहे’, अशा भावना लहरी यांनी व्यक्त केल्या आहेत.

कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. लॉकडाउनच्या काळात रामायण मालिकेचं पुर्नप्रक्षेपण करण्यात आलं होतं. ही मालिका पुन्हा बघताना अरविंद त्रिवेदी भावूक झाले होते.

    follow whatsapp