महात्मा गांधींनी ठरवलं असतं तर ते भगत सिंग यांची फाशी रद्द करण्यात यशस्वी झाले असते?

मुंबई तक

• 02:05 AM • 02 Oct 2021

फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर अनेकदा मेसेज फिरतो की जर महात्मा गांधी यांनी ठरवलं असतं तर ते भगत सिंग यांची फाशी वाचवू शकले असते. महात्मा गांधी यांनी जाणीवपूर्वक भगत सिंग यांना फाशी होऊ दिली अशीही चर्चा होते. आपण जाणून घेणार आहोत काय आहे वास्तव. 23 मार्च 1931 हाच तो दिवस होता, लाहोरमधलं सेंट्रल जेलमध्ये भगत सिंग, […]

Mumbaitak
follow google news

फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर अनेकदा मेसेज फिरतो की जर महात्मा गांधी यांनी ठरवलं असतं तर ते भगत सिंग यांची फाशी वाचवू शकले असते. महात्मा गांधी यांनी जाणीवपूर्वक भगत सिंग यांना फाशी होऊ दिली अशीही चर्चा होते. आपण जाणून घेणार आहोत काय आहे वास्तव.

हे वाचलं का?

23 मार्च 1931 हाच तो दिवस होता, लाहोरमधलं सेंट्रल जेलमध्ये भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली. या घटनेची जबाबदारी महात्मा गांधींवर टीका करणारे कायम त्यांच्यावरच ढकलत असतात.

महात्मा गांधी यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या..

भगतसिंग, राजगुरु, सुखदेव या तीन क्रांतीकारी तरूणांना सगळा देश ओळखू लागला होता. कोर्टात या तरूणांनी ट्रायलच्या दरम्यान जी वक्तव्यं केली होती त्यामुळे त्यांच्या प्रकरणाची खूप चर्चा झाली. महात्मा गांधी हे त्यावेळी भारतातले सर्वात मोठे नेते होते. त्यामुळे लोकांना महात्मा गांधी या प्रकरणात लक्ष घालतील अशी अपेक्षा होती.

17 फेब्रुवारी 1931 ला महात्मा गांधी आणि व्हॉईसरॉय इरविन यांच्यात चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी लोकांना अपेक्षा होती की महात्मा गांधी यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशी रोखण्यासाठी इरविन यांच्यावर दबाव टाकतील. ते ही अट ठेवतील की ब्रिटीश सरकारने जर फाशी माफ केली नाही तर चर्चा होणार नाही. मात्र महात्मा गांधी यांनी असं केलं नाही. यंग इंडियामध्ये लिहून त्यांनी आपली बाजू मांडली. काँग्रेस वर्किंग कमिटीला माझं मत मान्य होतं. आम्ही समझोता करण्यासाठी ही अट ठेवू शकत नव्हतो की तुम्ही भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा माफ करा.

महात्मा गांधींनी व्हाईसरॉयना काय सांगितलं?

महात्मा गांधी यांनी व्हाईसरॉयना हे सांगितलं की आम्ही जी चर्चा करतो आहोत ती भारतीयांच्या अधिकारांसाठी आहे. कुठल्याही गोष्टीसाठी ही चर्चा जोखमीत टाकता येणार नाही. महात्मा गांधी व्हाईसरॉय यांच्या समोर फाशी रोखण्यासाठी, टाळण्यासाठीचा मुद्दा अनेकदा काढला. 18 फेब्रुवारीला झालेल्या चर्चेत काय घडलं ते त्यांनी लिहिलं आहे.

‘आज मांडण्यात आलेला मुद्दा चर्चेशी संबंधित नव्हता. मी त्यांना हे सांगितलं तुम्हाला कदाचित हे पटणार नाही. मात्र जी परिस्थिती सध्या देशात आहे ती सुधारायची असेल तर भगत सिंग आणि त्यांच्या साथीदारांची फाशीची शिक्षा संपवली पाहिजे. व्हॉईसरॉय म्हणाले की तुम्ही ज्या प्रकारे मुद्दा मांडला ते आवडलं मला पण भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांची फाशी माफ करता येणार नाही. जास्तीत जास्त ही फाशी काही काळ पुढे ढकलण्याचा विचार करता येईल.’

महात्मा गांधी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशी टाळण्यासाठी आग्रही होते. इरविन यांनी सेक्रेटरी ऑफ स्टेट ला पाठवलेल्या अहवालात महात्मा गांधी यांच्यासोबत केलेल्या या चर्चेचा उल्लेख केला आहे. महात्मा गांधी हे अहिंसा तत्व मानतात. त्यामुळे कुणाचाही जीव जावा याच्या विरोधात ते आहे. त्यावेळी लोक महात्मा गांधींवर टीका करू लागले की महात्मा गांधी यांनी या तिघांची फाशी माफ करण्याऐवजी ती पुढे ढकला असे का म्हणत आहेत. त्यांनी ही शिक्षा माफ करण्यावरच जोर दिला पाहिजे. मात्र ही बाब खरंच शक्य होती का? भगत सिंग यांच्यावर सँडर्सची हत्या केल्याचा आऱोप होता. त्यांची फाशी माफ करून इंग्रज खून केला तरीही माफी देतात हा संदेश देशात पोहचवणं शक्य नव्हतं. तो काळ हा गुलामगिरीचा काळ होता. या तिघांनीही इंग्रजांच्या राजवटीविरोधा शस्त्र उचललं होतं त्यामुळे इंग्रज त्यांना माफ करतील हे अशक्यप्रायच होतं.

व्हॉईसरॉय इरविन यांच्यासमोर महात्मा गांधी यांनी हाच मुद्दा 19 मार्च 1931 लाही उपस्थित केला होता. मात्र त्यावेळी इरविन यांनी हे स्पष्ट केलं की तिघांचीही फाशी माफ करण्यासाखी कोणतीही परिस्थिती नाही. 19 मार्चला फाशीची तारीखही जाहीर झाली होती त्यामुळे ती आणखी पुढे ढकलण्याचाही काही प्रश्न उद्भवणार नाही असंही इरविन यांनी महात्मा गांधींना सांगितलं.

अशा सगळ्या घडामोडी घडूनही महात्मा गांधी यांनी त्यांचे प्रयत्न सोडले नाहीत. त्यांनी आसिफ अली यांना भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची भेट घेण्यासाठी पाठवलं. तुम्ही तिघे हिंसेचा मार्ग सोडून द्या हे वचन त्यांच्याकडून घेऊन या असा निरोप घेऊन आसिफ अली यांना महात्मा गांधी यांनी पाठवलं होतं. जर असं वचन या तिघांनीही दिलं असतं तर या तिघांची फाशीची शिक्षा कमी करण्यासाठी काहीतरी करू शकू असं महात्मा गांधींना वाटत होतं.

आसिफ अलींनी त्यावेळी काय म्हटलं?

‘मी दिल्लीतून लाहोरला आलो. महात्मा गांधींनी सांगितल्यानुसार मी भगत सिंग यांना भेटायला आलो होतो. मी त्यांच्याकडून हे लिखित स्वरूपात आणण्याची तयारी केली होती. आम्ही हिंसेचा मार्ग सोडतो आहोत, माझ्यासोबत असणाऱ्या सगळ्या क्रांतिकाऱ्यांनी हिंसेचा मार्ग सोडावा असं मी आवाहन करतो आहे हे भगत सिंग यांना यामध्ये लिहायाचं होतं. मी भगत सिंग यांना भेटण्यासाठी शक्य होते तेवढे सगळे प्रयत्न केले. मात्र मला त्यात अपयश आलं’ असं आसिफ अली यांनी त्यावेळी पत्रकारांना सांगितलं.

यानंतर 21 मार्च 1931 ला पुन्हा एकदा महात्मा गांधी यांनी इरविन यांची भेट घेतली. 22 मार्चला पुन्हा एकदा भेट घेतली. त्यानंतर व्हॉईसरॉय इरविन यांनी हे आश्वासन दिलं की मी या मागणीबाबत विचार करतो. 23 मार्च 1931 ला महात्मा गांधी यांनी इरविन यांना एक पत्र लिहिलं. आधी जाहीर केल्यानुसार 24 मार्च 1931 ला फाशीची शिक्षा या तिघांनाही दिली जाणार होती. त्याआधी एक दिवस म्हणजेच 23 मार्चला महात्मा गांधींनी इरविन यांना पत्र लिहिलं. सध्या देशातली जनता आक्रमक झाली आहे, क्रांतिकारी मोठ्या प्रमाणावर उठाव करत आहेत. तरीही ही सगळी परिस्थिती आम्ही नियंत्रणात आणू, आमची फक्त एकच मागणी आहे की या तिघांची फाशी तुम्ही माफ करा. मात्र इंग्रज सरकारने त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजेच 23 मार्च 1931 ला भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या तिघांना फाशी दिली.

या घटनेनंतर 24 मार्च 1931 ला महात्मा गांधी वार्षिक अधिवेशनासाठी कराचीला पोहचले. त्यावेळी जनतेच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली आणि भगत सिंग जिंदाबाद या घोषणा देण्यात आला. महात्मा गांधी यांनी इंग्रजांसोबत तह केला आणि तीन क्रांतीकाऱ्यांना फासावर लटकवून दिलं असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

अधिवेशनातल्या भाषणात गांधीजी काय म्हणाले?

एखाद्या खुन्याला, चोराला किंवा डाकूलाही फाशीची शिक्षा होणं हे मला माझ्या धर्माविरोधातलं वाटतं. मी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना वाचवू इच्छित नव्हतो असा संशय घेण्याचं काही कारण असूच शकत नाही. भगत सिंग आणि महात्मा गांधी या दोघांचेही मार्ग वेगवेगळे होते. महात्मा गांधी हे पण म्हणाले की माझ्याकडून या तिघांनाही वाचवण्यसाठी पूर्ण प्रयत्न केले. 24 मार्चला या तिघांना फाशी देतील हे जाहीर करण्यात आलं होतं त्याआधी एक दिवस म्हणजेच 23 मार्चलाही मी इरविन यांना चिठ्ठी लिहिली होती. मात्र मी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशी रोखण्यासाठी करत असलेले सगळे प्रयत्न अपयशी ठरले. असंही महात्मा गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

    follow whatsapp