जळगाव : भारत जोडो यात्रेला रविवारी महाराष्ट्राने निरोप दिला. जळगाव जिल्ह्यातील जामोद तालुक्यातील निमखेडी या गावातून यात्रा मध्यप्रदेशच्या सीमेवर दाखल झाली. यावेळी निमखेडी गावातील लहान मुलांनी रस्त्याच्या दुतर्फा उभं राहत मेणबत्त्या लावून राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेतील सर्व पदयात्री यांना अतिशय भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. इन्स्टुमेंटल राष्ट्रगीत वाजवून Light of unity नावाचा एक कार्यक्रमही घेण्यात आला. या वातावरणात अनेक पदयात्रींना गदगदून आलं होतं.
ADVERTISEMENT
उद्या आणि परवा म्हणजे सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस राहुल गांधी गुजरातच्या दौऱ्यावर असल्याने यात्रा मध्यप्रदेशच्या सीमेवरच थांबणार आहे. त्यानंतर बुधवारपासून पुन्हा मध्यप्रदेशमध्ये पुढील यात्रा सुरु होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून बाहेर पडता-पडता राहुल गांधी यांनी अखेरची कॉर्नर सभाही घेतली. यात बोलताना पदयात्रींप्रमाणेच ते देखील भावूक झालेले पहायला मिळाले.
राहुल गांधी काय म्हणाले?
शेतकऱ्यांचे, तरुणांचे, माता-भगिनींचे मनापासून धन्यवाद. मागच्या १४-१५ दिवसांत तुम्ही मला जे दिलं आहे, जे तुम्ही मला शिकवलं आहे, ते मला कुठेही शिकायला मिळणार नाही. तुमचं प्रेम, तुमचा विश्वास, तुमची समज. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेची समज, शेतकऱ्यांची समज, तरुणांची स्वप्न, माता-भगिनींचे दुःख हे सगळं तुम्ही मला सांगितलं. दाखवलं. हे मी कधीच विसरणार नाही.
हे सर्व ज्या महापुरुषांनी तुमच्या मनात, रक्तात भिनवलं त्या सर्वांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांचा आदर करतो. त्यांच्याशिवाय हा प्रदेश महाराष्ट्र नसता. यात मग छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले अशी यादी मोठी आहे. जर मी बोललो तर १०-१५ मिनिट जातील. त्यामुळे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद!
ADVERTISEMENT