टिपू सुलतानच्या नावावरून राजकारण तापलं; भाजप आणि बजरंग दल आक्रमक, काँग्रेसची टीका

मुंबई तक

• 01:55 PM • 26 Jan 2022

शिवशंकर तिवारी, प्रतिनिधी, मुंबई मुंबईतल्या मालाड क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यात येणार आहे. त्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हा वाद समोर आला आहे. संकुलाच्या बाहेर भाजप आणि बजरंग दलाने घोषणाबाजी करत आंदोलन केलं आहे. भाजप आणि बजरंग दलाकडून या नावला विरोध केला जातो आहे. देशात एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखेही लोक होऊन […]

Mumbaitak
follow google news

शिवशंकर तिवारी, प्रतिनिधी, मुंबई

हे वाचलं का?

मुंबईतल्या मालाड क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव देण्यात येणार आहे. त्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच हा वाद समोर आला आहे. संकुलाच्या बाहेर भाजप आणि बजरंग दलाने घोषणाबाजी करत आंदोलन केलं आहे. भाजप आणि बजरंग दलाकडून या नावला विरोध केला जातो आहे.

देशात एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखेही लोक होऊन गेलेत त्यांचं नाव द्या पण टिपू सुलतानचं नाही अशी मागणीही आंदोलन करणाऱ्यांनी केली आहे.

मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख काय म्हणाले?

‘शेर ए मैसूर टिपू सुलतान हे नाव भाजपच्या नगरसेवकाने दिलं होतं. त्यानंतर 2013 मध्येही भाजपच्या नगरसेवकाने वीर टिपू सुलतान मार्ग असं एका रस्त्याचं नामकरण केल्याचंही मी ऐकलं आहे. आता ज्या ग्राऊंडवरून वाद होतो आहे ते मागच्या पंधरा वर्षांपासून टिपू सुलतान नावानेच ओळखलं जातं. आता त्यामध्ये बॅडमिंटन कोर्ट तयार केलं, फुटबॉल ग्राऊंड तयार केलं, इतर सोयी सुविधा केल्या. ही माझी कामं लोकांपर्यंत पोहचू नयेत म्हणून भाजपकडून वाद निर्माण केला जातो आहे. टिपू सुलतानने इंग्रजांच्या विरोधात लढाई केली होती. गेल्या 70 वर्षात कधीही य नावावरून वाद झाला नाही. सगळ्या राज्यांमध्ये रोड, म्युझियम यांना नावं देण्यात आली. मात्र तेव्हा काही वाद झाला नाही. आता भाजपला विकास नको आहे. त्यामुळे ते नावाचं राजकारण करत आहेत.’ असा आरोप अस्लम शेख यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांचं म्हणणं काय?

‘मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. नामांतराचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं महापौरांनी मंगळवारीच सांगितलं आहे’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

भाजपने काय आरोप केला आहे?

अस्लम शेख हे अनधिकृत बांधकाम करत आहेत. त्यांनी मालवणी परिसराचं पाकिस्तान केलंय. ते हिंदूंना या परिसरातून हाकलून लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. बजरंग दल आणि भाजपाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत. या आंदोलनामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालाय. आंदोलकांनी बस थांबवत चाकातील हवा काढून टाकली. बसमधील प्रवाशांना रस्त्यावर थांबावं लागतंय. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लावलेले बॅनर आणि फलक आंदोलकांनी फाडून टाकले आहेत. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.

    follow whatsapp