दुर्दैवी आणि विषण्ण करणारी दुर्घटना! CDS बिपिन रावत यांच्या मृत्यूबाबत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला शोक

मुंबई तक

• 02:44 PM • 08 Dec 2021

भारताचे CDS बिपिन रावत यांचं आज हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याची घटना मनाला पटत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे […]

Mumbaitak
follow google news

भारताचे CDS बिपिन रावत यांचं आज हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याच प्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याची घटना मनाला पटत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ झालो आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते पण शेवटी ती  दुर्दैवी बातमी आलीच. अनेक आघाड्यांवर शौर्याने आणि धडाडीने नेतृत्व करणाऱ्या संरक्षण दलाच्या प्रमुखांचा त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत असा मृत्यू होणं नियतीलाही मान्य असणार नाही.

मी जनरल रावत आणि त्यांची पत्नी तसेच अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळं खूप व्यथित झालो आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे. ही दुर्घटना अत्यंत विषण्ण करणारी, दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात.

काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री

भारताचे संरक्षण दल हे सुसज्ज आणि बलशाली आहे. या तीनही दलांचे असे संयुक्त प्रमुखपद भूषवण्याचा पहिला गौरवही दिवंगत जनरल रावत यांना मिळाला. त्यांची कारकिर्दही त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि पदाला साजेशीच अशी होती. संरक्षण दलाला तडफदार आणि सर्व आघाड्यांवर ठसा उमटविलेल्या अनुभवी असे नेतृत्व मिळाल्याने आपल्या तीनही दलांचे मनोबल उंचावले होते,  त्याचे प्रत्यंतरही अलिकडच्या तीनही दलांच्या कामगिरीतून दिसत होते.

दुर्घटनेत दिवंगत रावत यांच्या पत्नीसह सुरक्षा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ब्रिगेडीयर आणि लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही अंत झाला आहे, हे अत्यंत दुःखद आहे. सुरक्षेतील कुशल, अनुभवी आणि धडाडीचे नेतृत्व गमावणे हे देशाच्या दृष्टीने मोठे नुकसान आहे. एकंदर दुर्घटनाच सबंध देशासह आपल्या सर्वांचे मन विषण्ण करणारी आहे. या सर्व शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी तसेच या सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

    follow whatsapp