विमानतळावर उतरल्यावर लोकांनी रस्त्यावरचे खड्डे बघायचे का?; नारायण राणेंनी ठाकरे सरकारला डिवचलं

मुंबई तक

• 08:50 AM • 09 Oct 2021

चिपी विमनातळावर उतरल्यावर लोकांनी खड्डे बघायचे का? असा प्रश्न विचारत नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला डिवचलं आहे. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे आज एकाच मंचावर होते. मात्र या दोघांमधला अबोला कायम होता. या दोघांनीही एकमेकांकडे दुर्लक्ष केलं. मात्र नारायण राणे जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी तक्रारींचा पाढाच मुख्यमंत्र्यासमोर वाचला. काय म्हणाले नारायण राणे? […]

Mumbaitak
follow google news

चिपी विमनातळावर उतरल्यावर लोकांनी खड्डे बघायचे का? असा प्रश्न विचारत नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला डिवचलं आहे. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे आज एकाच मंचावर होते. मात्र या दोघांमधला अबोला कायम होता. या दोघांनीही एकमेकांकडे दुर्लक्ष केलं. मात्र नारायण राणे जेव्हा भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी तक्रारींचा पाढाच मुख्यमंत्र्यासमोर वाचला.

हे वाचलं का?

काय म्हणाले नारायण राणे?

मी उद्धव ठाकरेंना एक विनंती करू इच्छितो त्यांनी हे फोटो बघावे.. आम्हाला विमानतळ नको हे म्हणणारे आंदोलक होते. 2009 मध्ये हे आंदोलन कुणी केलं? तुम्हाला माहित आहे. महिन्याला कोण जाऊन कोण काम अडवतं? मी नावं घेतली तर राजकारण होईल. रस्त्याच्या विकासकामात कोण अडसर ठरवत होते? विचारा जरा जाऊन तुम्हाला माहिती आहे. आज ते लोक या मंचावर बसले आहेत.

तुम्ही समजता तशी परिस्थिती आज नाही. तेव्हा काही गोष्टी होत्या. सन्मानीय आदित्य ठाकरेंनी इथला अभ्यास करावा, 481 पानांचा रिपोर्ट वाचावा. धरणाला एक रूपया अद्याप दिलेला नाही. काय विकास झाला? या एअरपोर्टलाही पाणी नाही. सबस्टेशन नाही, 34 कोटी नाही. चिपी विमानतळावर उतरल्यावर लोकांनी रस्त्यावरचे खड्डे बघायचे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला. हा देसाई कंपनीचा प्रायव्हेट लिमिटेड कार्यक्रम आहे का? असा प्रश्नही नारायण राणेंनी विचारला.

सिंधुदुर्ग येथील शाळांमध्ये शिक्षक नव्हते, मी एकाच वेळी 340 शिक्षक आणले. या जिल्ह्याचा विकास केला तो नारायण राणेने केला आहे हे जनतेला माहित आहे. मी त्याचं श्रेय घेणार नाही, मात्र लोकांना वस्तुस्थिती माहित आहे.

कोणतंही राजकारण करू नये असं मला वाटत होतं, सिंधुदुर्गाच्या चिपी विमानतळावरून विमान उडताना पाहावं आणि आनंद साजरा करावा असंच मला वाटत होतं. मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्रीसाहेब माझ्या कानात काहीतरी बोलले मात्र मला ते ऐकू गेलं नाही एक शब्द कानावर पडला… असो..सिंधुदुर्गाला आर्थिक समृद्धी यावी असा माझा मानस होता.

मुंबई हे माझं कार्यक्षेत्र असलं तरीही सिंधुदुर्ग हा माझा जन्म जिल्हा आहे. मी या जिल्ह्याचं ऋण मानतो. 1990 मध्ये या ठिकाणी आलो, निवडून आलो. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी मला पाठवलं त्यावेळी ते म्हणाले होते तुझी या जिल्ह्याला गरज आहे. मी इथे आलो, अनेक गोष्टी, समस्या समजून घेतल्या त्या सोडवल्या. शाळा असतील तर वर्ग नाही, वर्ग असतील तर शिक्षक नाही अशी अवस्था होती. रस्ते नाही, पाणी नाही अशी अवस्था होती.

टिंगू-मिंगू लागलेत बढाया मारायला ! चिपी विमातळाच्या उद्घाटनावरुन Shivsena-BJP मध्ये जुंपली

इथली मुलं कितीही शिकली तरीही मुंबई किंवा पुण्यात जात होती. मुंबईच्या मनी ऑर्डवर अवलंबून असलेल्या जिल्ह्याची स्थिती मी पाहिली आणि ठरवलं की विकास करायचा. विकास कुणी केला ते सगळ्या लोकांना माहित आहे. उद्धवजी बाळासाहेबांनी दिलेल्या प्रेरणेतून केलं. माझा स्वार्थ यामध्ये काहीही नव्हता. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कोणत्या माध्यमातून करता येईल? याचा विचार केला. त्यावेळी मला सल्ला देण्यात आला की टाटा इन्स्टिट्युटकडे गेलो त्यांनी 481 पानांचा अहवाल दिला आणि सांगितलं की सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा करा. त्यानंतर 1995 मध्ये शिवसेना भाजपची सत्ता आली. त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यांना सांगितलं की आपण पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा जाहीर करण्यासाठी परवानगी घेऊ. त्यांनी ग्रीन सिग्नल दिला आणि हा जिल्हा पर्यटन जिल्हा झाला. त्यानंतर मुख्यमंत्रीपदी बसलो, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनाही माहित आहे. रस्ते विकासासाठी मी त्यावेळी 120 कोटी दिले. पिण्याच्या पाण्यासाठी 118 कोटी दिले.

आज 9 ऑक्टोबरला सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं उद्घाटन होतं आहे याचा मला आनंद होतो आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सन्मानीय अनिल परब यांच्यासह सगळे मान्यवर या सोहळ्याला आले आहेत याचा मला विशेष आनंद होतो आहे अशा भावना नारायण राणे यांनी व्यक्त केल्या.

    follow whatsapp