सगळं सुरू मग नाट्यगृहं का बंद? अभिनेते Prashant Damle यांनी व्यक्त केली खंत!

मुंबई तक

• 04:19 PM • 19 Aug 2021

राज्यात सगळं सुरू झालं आहे, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानी आहे मात्र नाट्यगृहं का बंद आहेत? असा प्रश्न सुप्रिसद्ध कलाकार प्रशांत दामले यांनी विचारला आहे. कोरोना, लॉकडाऊन यामुळे नाटक मरणार नाही. तरीही नजीकच्या काळात भविष्यात लेखक, नवी नाटकं निर्माण होतील का? हा प्रश्न मला सतावतो आहे असंही प्रशांत दामलेंनी म्हटलं आहे. तरूण लेखक, कलाकार, सीरियल, ओटीटीकडे वळतील […]

Mumbaitak
follow google news

राज्यात सगळं सुरू झालं आहे, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानी आहे मात्र नाट्यगृहं का बंद आहेत? असा प्रश्न सुप्रिसद्ध कलाकार प्रशांत दामले यांनी विचारला आहे. कोरोना, लॉकडाऊन यामुळे नाटक मरणार नाही. तरीही नजीकच्या काळात भविष्यात लेखक, नवी नाटकं निर्माण होतील का? हा प्रश्न मला सतावतो आहे असंही प्रशांत दामलेंनी म्हटलं आहे. तरूण लेखक, कलाकार, सीरियल, ओटीटीकडे वळतील अशी भीती निर्माण झाली असल्याचंही प्रशांत दामलेंनी म्हटलं आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची बालगंधर्व रंगमंदिर पुनर्निर्माण प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतली त्या वेळी ते बोलत होते.

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाले प्रशांत दामले?

नाट्यगृह ही अशी एकमेव जागा आहे जिथे नाटक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बघितलं जातं आणि दाखवलं जातं असं कलाकार म्हणून प्रेक्षक म्हणून मला वाटतं. आत्ता जेव्हा नोव्हेंबर महिन्यात शासनाने नाट्यगृहं सुरू केली होती त्यानंतर प्रत्येक रसिक प्रेक्षकाने मास्क घातल्याशिवाय आम्ही प्रयोग सुरू करत नव्हतो. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही नाटकाचे प्रयोग केले होते. कोरोनाची तिसरी लाट येते आहे अशी सगळीकडे हवा आहे किंवा अफवा आहे काय असेल ते माहित नाही. आपल्याला त्याला तोंड द्यावं लागणार आहे हे देखील तेवढंच खरं आहे. ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत तसंच नाट्यगृहं सुरू व्हायला हरकत नाही असं कलाकार म्हणून आणि प्रेक्षक म्हणून मला प्रामाणिकपणे वाटतं.

मराठी नाटकासाठी प्रेक्षक, कलाकार कसे तयार होणार?

जी नवी पिढी ज्यांना नाटक करायचं आहे किंवा बघायचं आहे ते अशी नाट्यगृहं बंद ठेवली तर कसे तयार होणार. कलाकार सीरियल्स किंवा ओटीटीकडे वळतील. मी नेहमीच सांगत असतो की नाटकांचा पाया ही संहिता असते. लेखकही तिकडेच वळले तर पुढची दोन वर्षे तरी चांगलं नाटक येईल का नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. बॅकस्टेजचे कलाकार ओटीटीला जाऊ शकतात. प्रत्येक नाटकाचा जो बावीस पंचवीस लोकांचा स्टाफ आहे तो अत्यंत व्हॅल्युएबल आहे. त्याला गमावणं योग्य ठरणार नाही. चांगली मराठी नाटकं येणं आणि ती चालणं आवश्यक असंही मला वाटतं.

मराठी नाटक काही मरणार नाही. या सगळ्या परिस्थितीतून आम्ही टिकणार आहोत याची आम्हाला खात्री आहे. चॅनल्स आली, आयपीएल स्पर्धा आल्या, बॉम्बस्फोट झाले विविध घटना घडल्या पण मराठी नाटक आणि त्याची परंपरा कायम आहे. महाराष्ट्र सरकारने ते उभं करण्यासाठी पाठिंबा द्यावा असं मला एक कलाकार म्हणून वाटतं असंही प्रशांत दामले यांनी माध्यमांना सांगितलं.

    follow whatsapp